नवी दिल्ली – केंद्र सरकारने रखडलेल्या घरांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वित्तपुरवठा करण्याची योजना सुरू केली होती. याअंतर्गत रखडलेल्या 101 प्रकल्पांना 10 हजार 300 कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात आला असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
मंदीमुळे बरेच विकसक परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प पूर्ण करू शकत नव्हते. हे प्रकल्प विकसकांना पूर्ण करता यावेत याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या वित्तपुरवठ्यामुळे 71 हजार 500 घरे तयार होतील. हे काम वेगात व्हावे याकरिता अर्थमंत्रालय पुढाकार घेत असून गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. दरम्यान, या योजनेची अंमलबजावणी अतिशय संथ गतीने होत असल्याबद्दल विकसकांच्या संघटनांनी असमाधान व्यक्त केले आहे. अंमलबजावणीचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
25 हजार कोटी रुपयांचा निधी
देशात किफायतशीर घरांचे बरेच प्रकल्प भांडवल असुलभतेमुळे रखडले होते हे. प्रकल्प सुरू करावेत याकरिता केंद्र सरकारने 25 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. त्यापैकी आता 10 हजार कोटी रुपयांचा वापर झाला आहे. आगामी काळातही आवश्यक त्या प्रकल्पाची ओळख करून त्यांना निधी पुरवण्यात येणार आहे. सरकारच्या हिशेबानुसार देशात सध्या 4 लाख 58 हजार सदनिकांचे प्रकल्प रखडले आहेत. ते लवकर पूर्ण व्हावे अशी सरकारची इच्छा आहे.