– अमित डोंगरे
राहुल द्रविडकडे भारताच्या दुसऱ्या संघाचे प्रशिक्षकपद दिले तेव्हाच नवोदितांच्या गुणवत्तेला न्याय मिळणार याची खात्री झाली. पहिला सामना झाला पण काही प्रश्नही निर्माण झाले. खरेच पृथ्वी शॉ, भुवनेश्वर कुमार हे खेळाडू जबाबदारीने खेळ करतात का? हा दौरा रोटेशन पॉलिसीसाठी उपयुक्त आहे हे द्रविडने सांगितले असले तरीही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही तितक्याच गंभीरतेने झाली पाहिजे हीच अपेक्षा आहे.
संघात कर्णधार म्हणून शिखऱ धवन आहे त्यामुळे त्याचा सलामीवीराचा क्रम हलवता येणार नाही. त्याच्यासह पहिल्या सामन्यात शॉ सलामीला आला. त्याने धडाक्यात सुरुवात करताना अवघ्या 24 चेंडूत 43 धावांची खेळी केली व संघाला आक्रमक प्रारंभ करून दिला. मात्र, जी गोष्ट कधीकाळी वीरेंद्र सेहवागच्या बाबतीत सांगायचे तीच आता शॉ याच्याबद्दल बोलावीशी वाटते. सेहवाग कोणत्या अफलातून चेंडूवर षटकार मारेल किंवा कोणत्याही सर्वसामान्य चेंडूवर बाद होईल हे सांगता येत नव्हते.
खरेतर भारतीय संघ डावाची सुरुवातच 1 बाद 0 या धावसंख्येवरून सुरुवात करायचा. याचे कारण म्हणजे सेहवाग कोणताही विचार न करता आक्रमक फटकेबाजी करायचा व नको तेव्हा बादही व्हायचा. त्यामुळे तो कधीही बाद होईल हे गृहित धरलेले असायचे. कालांतराने त्याच्यामध्येही फरक पडला व मर्यादित षटकांच्या सामन्यांसह तो कसोटीतही यशस्वी ठरला.
सचिन तेंडुलकर व सेहवाग यांचे मिश्रण असे शॉ याला संबोधले जायचे पण त्याची गेल्या काही वर्षांतच नव्हे तर कालच्या सामन्यातही बाद होण्याची पद्धत पाहिली की असे वाटते त्याच्यापेक्षा रॉबिन उथप्पा बरा होता. शॉकडे मैदानात सर्वदूर मारता येतील असे कित्येक फटके आहेत पण केवळ डोके ठिकाणावर न ठेवता फलंदाजी केल्यामुळे चांगल्या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत होताना दिसत नाही.
द्रविडनेच त्याची शाळा घेतली तरच काही आशा आहेत अन्यथा एक चांगला फलंदाज होता असे त्याच्याबाबत म्हणायची वेळ येइल. जे पृथ्वीच्या बाबतीत तेच भुवनेश्वर व पंड्या बंधूंच्या बाबतीत बोलावे लागेल. भुवी दीर्घ कालावधीनंतर संघात आला. श्रीलंकेतील पावसाळी वातावरण, सुरुवातीला वेगवान व स्विंग गोलंदाजीला मदत करणारी खेळपट्टी असे सगळे बाजूने असतानाही त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
भारताचा सर्वात अचूक स्विंग गोलंदाज अशी त्याची ख्याती आता मातीमोल ठरत आहे. पुढील सामन्यात चेतन सकारिया किंवा नवदीप सैनी यांना संधी मिळावी म्हणजे भारताच्या दुसऱ्या संघातील स्थानही निश्चित नसल्याची जाणीव भुवीला होईल, कामगिरीत सातत्य येईल अशी अपेक्षा आहे. पंड्या बंधू तर नैसर्गिक खेळाडू आहेत पण तरीही जबाबदारी स्वीकारणे म्हणजे काय याचे घडे त्यांना देण्याची हीच योग्य वेळ आहे.
आंतरराष्ट्रीय सामना म्हणजे आयपीएल नव्हे हे आता त्यांना कोणीतरी सांगायला हवे. द्रविडनेच सांगितले होते की सगळ्यांनाच संधी मिळणे शक्य नाही पण निदान सहापैकी उरलेल्या पाच सामन्यांत किमान रोटेशन पॉलिसी तरी असावी म्हणजे आगामी टी-20 विश्वकरंडकाचे खरे मटेरियल कोण होऊ शकते याचा अंदाज निश्चितच येईल.