कोल्हापूर – कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 मधून कृषिपंपाच्या वीजबिलांच्या थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्के सूट देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 90 हजार 610 कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सध्या 69 कोटी 54 लाखांचे चालू वीजबिल व 371 कोटी 18 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे.
योजनेनुसार येत्या मार्चपर्यंत यातील 50 टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित 50 टक्के थकीत रक्कम माफ होणार आहे. मात्र योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा भरणा नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येणार आहे.
गेल्या मार्चपासून महावितरणने कृषिपंप वीज धोरण 2020 च्या अंमलबजावणीला सुरवात केली. या धोरणातील योजनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 लाख 45 हजार 506 शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. निर्लेखनाद्वारे महावितरणकडून मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी रक्कम वगळून या शेतकऱ्यांकडे 429 कोटी 59 लाख सुधारित थकबाकी आहे.
यातील 50 टक्के थकबाकी व चालू वीजबिलांचे 86 कोटी 55 लाख रुपयांचा भरणा येत्या मार्च 2022 पर्यंत केल्यास थकबाकीची उर्वरित 50 टक्के रक्कम माफ होणार आहे.
कृषिपंप वीजजोडणी धोरणाची गावागावांमध्ये जनजागृती करून महावितरणकडून शेतकऱ्यांना वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याची आवाहन करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे असलेल्या एकूण थकबाकीमधील तब्बल 66 टक्के रक्कम माफ होणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांच्या वीजबिलांचे किमान चालू वीजबिलांचा भरणा करणे आवश्यक आहे.
गेल्या दीड वर्षांपासून सर्व वर्गवारीच्या ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महावितरण सद्यस्थितीत अत्यंत कठीण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक झाले आहे.
योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणा देखील नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभागी व्हावे व सोबतच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.