कोलंबो -चरिथ असालंका, अविष्का फर्नांडो यांचे दमदार अर्धशतक तर, चमिका करुणारत्ने, मिनोद भानुका व धनंजय डीसिल्व्हा यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर यजमान श्रीलंकेने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 9 बाद 275 धावा केल्या. मालिका विजयासाठी भारताला 276 धावा करण्याचे आव्हान असून या सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्याची श्रीलंका संघाला संधी आहे.
या सामन्यातही श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रमुख फलंदाजांच्या कामगिरीमुळे 50 षटकांत 9 बाद 275 धावा केल्या. श्रीलंकेकडून चरिथ असालांकाने 65 तर, सलामीवीर अविष्का फर्नांडोने 50 धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिली. सलामीवीर फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी 77 धावांची सलामी दिली. हे दोघे खेळत असताना भारतीय गोलंदाज दडपणाखाली आले होते. मात्र, कर्णधार शिखऱ धवनने केलेला गोलंदाजीतील बदल कलाटणी देणारा ठरला.
लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलने भानुकाला 36 धावांवर बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. लगेचच याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने भानुका राजपक्षेलाही बाद केले. यावेळी यजमान संघाची अवस्था 2 बाद 77 अशी झाली. त्यानंतर त्यांचा धावांचा वेग कमी झाला. त्यानंतर धनंजय डी सिल्वासह फर्नांडोने डाव सावरत संघाचे शतक फलकावर लावले.
पहिल्या सामन्यात एकही बळी मिळवता न आलेल्या भुवनेश्वर कुमारने फर्नांडोला 50 धावांवर बाद केले. त्यानंतर डीसिल्वाही 32 धावांवर बाद झाला.
कर्णधार दासून शनाकानेही निराशा केली. प्रमुख फलंदाज बाद होत असताना चरिथ असालंकाने एकहाती किल्ला लढवला. मात्र, अर्धशतकानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो भुवनेश्वरच्याच गोलंदाजीवर 65 धावांवर बाद झाला. आक्रमक प्रारंभ करणाऱ्या श्रीलंकेचे नंतरचे फलंदाज मात्र ठरावीक अंतराने बाद होत होते. त्याचवेळी करुणारत्नेने पुन्हा एकदा पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात तळात फलंदाजी करताना भारताच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. त्याचे अर्धशतक पुन्हा एकदा हुकले. मात्र, त्याने 44 धावांची खेळी करत संघाला 274 धावांची मजल मारून दिली. भारताकडून चहल व भुवनेश्वर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यांना सुरेख साथ देताना दीपक चहरने 2 बळी मिळवले.
वाइड चेंडूंची खिरापत
पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तरीही त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी तब्बल 12 चेंडू वाइड टाकले होते. म्हणजेच 50 च्या जागी 52 षटके गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने 13 वाइड चेडूं टाकत श्रीलंकेच्या फलंदाजांना खिरापतच वाटली. या चेंडूंवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली अन्यथा त्यांचा डाव अडीचशे धावांच्या आत रोखण्यात यश मिळाले असते.
संक्षिप्त धावफलक –
श्रीलंका – 50 षटकांत 9 बाद 275 धावा. (चरिथ असालंका 65, अविष्का फर्नांडो 50, चमिका करुणारत्ने 44, मिनोद भानुका 36, धनंजय डीसिल्व्हा 32, दासून शनाका 16, यजुवेंद्र चहल 3-50, भुनेश्वर कुमार 3-54, दीपक चहर 2-53).