आपल्याला जीवन मिळालेले आहे ते सुखी व आनंदात व्यतीत करण्यासाठी, तसेच पुढच्या पिढीचे जीवन सुखी होण्यासाठी आपल्यावर काही नैतिक जबाबदारी आहे त्याविषयी थोडेसे..
सगळ्या सजीवांमध्ये माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आजवर बरीच प्रगती केली, पण ही प्रगती करतानाच मानवाने पर्यावरणाचा बराच ऱ्हास केलेला आहे. वास्तविक पाहता आपल्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे, पण मानवाने प्रगती करण्याच्या दृष्टीने पर्यावरणाचे संतुलन बिघडवून टाकलेले आहे. आपण मात्र आपल्या परीने पर्यावरणाचे रक्षण करण्याचा परेपूर प्रयत्न करावयाचा आहे.
बरीच माणसे साध्या-साध्या बाबींकडे लक्षच देत नाही, त्यामुळे पर्यावरणाच्या हानीस ते हातभार लावत असतात. प्लॅस्टिकचा वापर सध्या अविभाज्य होऊन बसला आहे. आपण आपल्या परीने प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे. हेच प्लॅस्टिक गायींच्या पोटातही जाते. असा त्रास होतोच पण प्लॅस्टिक जळले की, वायू प्रदूषणही फार होते. आपण आपल्या परीने प्लॅस्टिकचा वापर कमी करू शकतो. रोज आपण प्लॅस्टिकच्या पिशवीतून दूध घेत असतो. पिशवीतून दूध काढताना आपण एक छोटीशी पण फारच गंभीर चूक करीत असतो.
पिशवी फोडताना आपण एक कोपरा कात्रीने कापतो, हीच ती चूक! तो कोपरा पिशवीपासून पूर्णपणे वेगळा होतो. तो छोटासा तुकडा कचऱ्यात जातो. असे रोज लाखो तुकडे निर्माण होत असतात. पिशवीचा फेरवापर केला जातो, पण अशा छोट्या तुकड्यांकडे कुणीच लक्ष देत नाही. प्लॅस्टिकचे विघटन व्हायला 500 ते 1000 वर्षे लागतात. म्हणजे पुढची 500 ते 1000 वर्षे आज कापलेला तो छोटासा तुकडा पृथ्वीवर जसाच्या तसा असणार आहे. असे कोट्यवधी तुकडे रोज तयार होत आहेत. म्हणजेच आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत- प्लॅस्टिकचे प्रदूषण? आपण ही चूक टाळू शकतो. पिशवी फोडताना कोपऱ्याला तिरपा छेद घेऊन तो तुकडा पूर्णपणे पिशवीपासून वेगळा करावयाचा नाही. दूध पिशवीतून बाहेर काढण्यासाठी पिशवीच्या टोकाला एक छोटासा आडवा छेद घ्यावयाचा. त्यामुळे पिवशीतून दूध काढता येईल आणि पिशवीचा कोणताही हिस्सा हा पिशवीपासून पूर्णपणे वेगळा होणार नाही. दुधाचीच पिशवी कशाला इतर कोणतीही प्लॅस्टिकची पिशवी कापताना अशीच काळजी घ्यावी म्हणजे झाले.
सध्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. पृथ्वीवर 71 टक्के पृष्ठभागावर पाणी आहे. तर पृथ्वीवरील उपलब्ध पाण्यातील फक्त 3 टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे. यावरून लक्षात येईल की आपल्याला शेतीसाठी, पिण्यासाठी मुळात किती कमी पाणी उपलब्ध आहे. पर्यावरणातील बिघाडामुळे पिण्यायोग्य पाणी हे दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेले आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन या शहरात पाण्याचा प्रश्न इतका भयंकर झाला की तेथील महानगर पालिकेने अधिकृतरीत्या जाहीर करून टाकले की, “सरकारकडून आता पाणीपुरवठा होणार नाही.’ भारतातही चेन्नई, बंगळुरू ही शहरे पाणी प्रश्नाचा सामना करीत आहेत. आपण आपल्या परीने पाण्याचा वापर सुव्यवस्थितपणे करावयास हवा. एखादे पाणी वापरल्यानंतर ते पिण्यायोग्य राहाणार नाही पण इतर कामासाठी आपण ते उपयोगात आणू शकतो याचे भान नेहमीच ठेवावे. जल शुद्धीकरण यंत्राद्वारे एक लिटर शुद्धपाणी मिळविताना तीन लिटर पाणी वाया घालवले जाते. त्या पाण्याचा काहीच उपयोग करता येत नाही. म्हणून असे जल शुद्धीकरण यंत्र बसविताना खरेच कितपत आवश्यकता आहे याची गरज पाहावी. जल शुद्धीकरणाचे इतरही पर्याय वापरायला हरकत नाही.
आपण जेवढे प्रदूषण कमी करण्यास हातभार लावू तेवढे आपले आणि येणाऱ्या पिढीचे आरोग्यही उत्तम राहील. सध्या वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि आणखीही इतर प्रदूषणांमुळे समस्त जीवसृष्टीचे जीवनच धोक्यात आलेले आहे. आपल्याला आपले आरोग्यपूर्ण आयुष्य जगायचे असेल आणि पुढच्या पिढीचेही आयुष्य चांगले असावे, असे वाटत असेल तर या प्रदूषणरूपी राक्षसाला वेळीच मारला पाहिजे.
आपण फळे आणली जसे आंबे, जांभूळ, बोर वगैरे यांच्या बिया कचऱ्यात टाकून न देता त्या बाजूला काढून ठेवाव्यात आणि जेथे मोकळी जागा असेल, तेथे टाकून द्याव्यात. किंवा अशा बिया मातीत टाकून चिखलाचे गोळे तयार करून आगगाडीने अथवा इतर साधनाने प्रवास करताना घाटात किंवा रस्त्याच्या कडेला फेकून द्यावेत. सध्या भूजलपातळी ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे.
वृक्षांमुळे भूजलपातळी उंचावण्यास मदत होते. सध्याला भूजलाचा उपसा करण्यात भारत पहिल्या 10 देशांच्या सूचित येतो. भूजल जास्त उपसणे हे पुढच्या पिढीसाठी अधिकच घातक असणार आहे. जांभुळ, चिंच, कडूलिंब, पिंपळ, बाभूळ, वड हे वृक्ष अत्यंत कमी पाण्यावर आणि अगदी ओसाड, उजाड जमिनीवरही येतात. म्हणून जमीन कशीही असो, तेथे झाड लावणे हे अत्यंत गरजेचे बनलेले आहे.
अन्नधान्याची नासाडी टाळली पाहिजे. सुंयक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारतात 2019 साली घरांतील जवळपास 6.87 कोटी टन अन्न वाया गेले. घरांमध्ये वाया जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे प्रमाण प्रतिवर्ष, प्रतिव्यक्ती सुमारे 50 किलो ग्रॅम, म्हणजे वर्षाला 6,78,60,163 टन असण्याचा अंदाज आहे. येथे दिलेला आकडा फक्त घरांतील वाया गेलेले अन्न दाखवतो. त्यात दुकानांतून, गोदामांतून, वितरणांतून वाया गेलेले धान्य गृहित धरलेले नाही. हीच जर नासाडी आपण टाळली तर भारतात कोणीही कुपोषित राहणार नाही आणि भूकेने कोणीही मरणार नाही.
आपण जर प्रत्येकाने पाणी, वीज, अन्न-धान्य, इंधन, इतर साधन सुविधा जसे कापड, कागद यांसारख्या अनेक वस्तू यांचा जर सुयोग्य पद्धतीने वापर केला, तर आपला भारत देश खूपच झपाट्याने प्रगती करेल आणि पर्यावरणाचेही संरक्षण, संवर्धन होईल. येथे फक्त व्यक्तिगत पातळीवर करावयाच्याच उपाय योजनांचा थोडाफार विचार केलेला आहे, पण आपण एका गावातील सर्वांनी एकत्र येऊन, तसेच अन्य बऱ्याच सामाजिक संस्थांच्या मोहिमेत व योजनेत सामील होऊन आणखीही चालना देऊ शकतो. वास्तविक पाहता “प्रदूषण’ हा मोठा उग्र व गंभीर विषय आहे, मात्र आपण प्रत्येकाने पर्यावरण संतुलनासाठी आपला खारीचा वाटा जर उचलला तर प्रदूषणाची कोणतीही समस्या उरणारच नाही, हे निश्चित.
आपण आपल्या मन मंदिराच्या गाभऱ्यात बसून मनोदेवतेला एकच अश्वासन द्यावयाचे आहे की, पुढच्या पिढीला मी जास्तीत जास्त चांगले पर्यावरण देईन आणि हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी गरज आहे ती फक्त आपण आपले विचार योग्य दिशेने नेण्याची आणि मनाने उचल घेण्याची!
अनिकेत भालेराव