नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. संगत ही आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पाडत असते. आपण कोणत्या लोकांच्या सान्निध्यात राहतो, त्यांना मानतो, त्यांच्याशी जवळीक करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
एकदा एक थकलेला शिकारी जंगलातील एका झाडाखाली निद्राधीन होतो. मात्र त्याच्या तोंडावर झाडाच्या फांद्यांच्या कपारीतून ऊन येत असतं. शिकाऱ्याला मात्र ते जाणवत नाही. परंतु तिथून जाणाऱ्या एका हंसाला त्याची किव येते. तो हंस त्याच झाडाच्या फांदीवर बसून त्याच्यावर येत असलेले ऊन रोखण्यासाठी स्वतःचे पंख विखरतो आणि त्याला सावली देतो. तेवढ्यात तिथे एक कावळा येतो आणि त्या शिकाऱ्याला त्रास देण्याच्या उद्देशाने हंसाजवळच त्याच फांदीवर येऊन बसतो.
तो दृष्ट कावळा शिकाऱ्याच्या तोंडावर विष्ठा करून उडून जातो. हंस हे सगळे बघतो तरीही डोळे मिटून तिथेच बसून असतो. शिकारी अचानक जागा होतो आणि झाड्याच्या फांदीवर हंसाला बसलेला बघतो. त्याला वाटते की हंसानेच विष्ठा केली. मागचा पुढचा विचार न करता शिकारी हंसाला बाण मारतो.
मरणयातनेने विव्हळत हंस त्याला म्हणतो की, मी तर तुला सावली देत होतो आणि ज्या कावळ्याने विष्ठा केली तो तर उडून गेला. मग तू मला का मारलंस? यावर शिकारी म्हणतो, कदाचित मी चुकीचा असेल. परंतु कावळ्याच्या क्षणाच्या सहवासाने तुझ्यावर ही वेळ आणली. तुमच्या दोघात कोण चूक बरोबर माहीत नाही. परंतु त्याला तिथे तू बसू दिलेस त्याची संगत घेतली हा तुझाच दोष आहे.
पंचतंत्रातील ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवून जाते. माणसाने हंसासारखे निर्मळ जरूर असावे, परंतु स्वार्थी आणि कपटी कावळ्यांची संगत टाळलेली कधीही बरीच. संगतीचा परिणाम कळत नकळत होतच असतो.
आयुष्यात चांगल्या माणसाच्या संगतीत राहिल्यास जीवनाला गती प्राप्त होते. परंतु जर संगत चुकली तर आयुष्याचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपली संगत फारच चाणाक्षपणे व सद्सद्विवेकबुद्धीने जोडावी. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आयुष्यावर विशिष्ट असा प्रभाव टाकत असते. मात्र ती व्यक्ती कोणत्या विचारसरणीची आहे यावर आयुष्यातील यशापयश अवलंबून असते.
आपल्या सहवासात येणाऱ्या माणसांच्या प्रभावामुळे आपण हळूहळू त्यांच्याप्रमाणे बनू लागतो. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे, स्वभाव, विचार आणि एकूणच व्यक्तिमत्त्व आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचे ठरत असतात. म्हणूनच आपली सोबत कशी असावी याबाबत आपण जागरूक असायला हवे.मोरोपंतांनी आपल्या केकावलीतून सुयोग्य असे भाष्य केले आहे.
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
यावर एकनाथांच्या जीवनातील एक घटनादेखील आपल्याला खूप काही सांगून जाते. कावसनमधील एक गावबा नामक मुलगा संत एकनाथांच्या घरी राहण्यास आला. जेव्हा जेव्हा एकनाथ महाराज प्रवचन करीत त्यावेळी गावबा एका कोपऱ्यात बसून शांत चित्ताने ते ऐकायचा. त्यावेळी एकनाथ रामायण ग्रंथ लिहित होते. त्यांचं वय झालं होतं. ज्यावेळेस एकनाथ महाराज हा अवतार पूर्ण होत आला. त्यावेळी रामायणाचा काही भाग शिल्लक राहिला होता. एका दिवशी एकनाथांनी हरीपंडितांना सांगितलं, येत्या षष्ठीला मी माहेरी जाणार. सुजाण श्रोत्यांना ती सूचना कळली.
एकानं विचारलं, मग हा ग्रंथ अपुरा राहणार का? फक्त भावार्थ रामायणासारखा महान ग्रंथ आता कसा पूर्ण करावा? हा प्रश्न होता. तेवढ्यात तिथे गावबा समोर आले. एकनाथ महाराज म्हणाले, अरे हे गावबा महाराज आहेत की ते उर्वरित रामायण पूर्ण करतील. लोक आश्चर्यानं पाहू लागले. नाथांनी गावबाला सूचना केली. गावबाने नमस्कार केला नाथांना आणि तो रामायण सांगू लागला. तेसुद्धा नाथांसारख्या भाषेत आणि रसाळपणे. हा होता संतसंगतीचा आणि सुसंगतीचा परिणाम.
“आम्ही बि-घडलो, तुम्ही बि-घडा’ या वाक्याचा खरा अर्थ जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण व्हायला हवे. आता “बि’घडणे’ आणि “बिघडणे’ या व्याख्याही तुमच्या संगतीवरच अवलंबून असणार आहेत. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावीच लागेल. निराशावादी प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो, तर आशावादी प्रत्येक अडचणीमध्ये संधी पाहतो. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. आता आपल्यालाच ठरवायचं आहे की, कोणत्या लोकांची संगत आपल्या जीवनात असावी.
सागर ननावरे