मुंबईच्या गिरण्यात काम करणाऱ्या कामगारांच्या न संपणाऱ्या अनेक समस्या होत्या. मालकांच्या मनमानीने अव्वाच्या सव्वा कामाचे तास, कामाच्या मानाने मिळणारे तुटपुंजे वेतन अन् दिवसभर फक्त कापसाच्या गठड्यांशी मारामारी. हे करत असताना कामगारांचे फारच हाल होते.
गिरणी मालकांनी बांधलेली घरे म्हणजे कोंडवाडे होते. सूर्याच्या प्रकाशालाही या चाळीत शिरायला वाव नव्हता अशी ही रचना होती.सूर्यप्रकाशाची ही गत तर वायुवीजनाबद्दल न बोललेलेच बरे. सार्वजनिक नळ होते पण या नळाला पाणी कधी येईल याची कुंडली ज्योतिषाला देखील मांडता येत नव्हती. या सगळ्या विपरीत परिस्थितीशी हा कामगार अविरत झगडत होता. गिरणी मालकांच्या विरोधात बोलण्यासाठी कुठेही कामगार संघटना जवळजवळ नव्हतीच किंवा असली तरी फक्त एखाद्या मिलपुरतीच मर्यादित होती. असा आवाज उठवण्याची कोणी हिम्मत केली तर त्यांची पद्धतशीर मुस्कटदाबी केली जात होती. पण अशाही परिस्थितीवर मात करून चाळकरी मंडळी येणारे पुढचे दिवस चांगले येतील या आशेवर आला दिवस पुढे ढकलत होती.
म्हणतात ना “कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहात नाही’ आणि “रात्रीच्या अंधारानंतर सूर्यप्रकाश येणारच’. काळ हळूहळू पुढे जाऊ लागला. गिरणी कामगारांसाठी निरनिराळे कामगार कायदे बनू लागले. बदलत्या कायद्यानुसार कामाच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. त्याबरोबरच मुंबईची परिस्थितीही सुधारू लागली.गिरणगावाने आता चांगलेच बाळसे धरले होते. प्राप्त परिस्थितीला स्वीकारून पुढे जाणे हा मुंबईचा स्थायीभाव बनला होता आणि मुंबई कधीही कोणत्याही गोष्टीसाठी थांबत नाही हा नवीन लौकिक मुंबईने तेव्हापासूनच अंगीकारला होता.
मुंबईने या अठरा पगड जातीच्या लोकांना आपल्या उदरात सामावून त्यांना माणसाळवले होते. पर्यायाने गिरणी कामगारांची आर्थिक स्थिती सुधारायला लागली. त्यांचे कामाचे तास कायद्यानुसार कमी झाले. वेळच्या वेळी बोनस, पेन्शन, ग्रॅज्युईटी इत्यादी गोष्टी मिळू लागल्या. चाळीतील चाळकऱ्यांचे राहणीमान बदलले. बदललेल्या परिस्थितीशी आणि मुंबईशी त्यांनी जुळवून घेतले. कामगार संघटना बाळसे धरू लागल्या. त्यांचा आवाज वाढू लागला. कामगार संघटनांनी आपल्या एकीच्या जोरावर मालकवर्गावर चांगलीच दहशत बसवली.
गिरणीच्या बाबत जी गोष्ट घडत होती तीच गोष्ट इतरही कामगार आस्थापनांमध्ये घडत होती. कामगारांवर होणारे अत्याचार हा सगळ्याच औद्योगिक विस्ताराचा अविभाज्य भाग होता. कामगारांना त्यांचा हक्क मिळणे म्हणजे आपल्या फायद्यातला तोटा असे गणित सगळीकडे मांडले जात होते. कामगारांची कोणतीही मागणी पूर्ण करणे मालकांच्या जीवावर येत होती. या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी चांगला अभ्यासू कामगार प्रतिनिधी तयार होण्याची अत्यंत गरज होती. कामगारांची बाजू मालकांसमोर ठणकावून सांगणारा नेता या गिरणी कामगारांना हवा होता.
त्याचवेळी प्रीमियर ऑटोमोबाइलमध्ये डॉ. दत्ता सामंत यांनी असहकार आणि आंदोलनाचे शस्त्र उगारून प्रीमियरच्या कामगारांना घसघशीत वेतनवाढ आणि हक्काचा बोनस मिळवून दिला. गिरणी कामगारांना आशेचा नवा किरण दिसू लागला होता. सामंतांनी प्रीमियरच्या कामगारांना ज्याप्रमाणे वेतन वाढ मिळवून दिली, त्याचप्रमाणे आपल्यालाही वेतनवाढ आणि बोनस मिळेल या अपेक्षेने गिरणी कामागारांनी दत्ता सामंतांना आपला नेता म्हणून एकमुखाने मान्य केले.
कामगार कायद्यांच्या सुधारणेमुळे मिलच्या कामगारांची स्थिती आधीपेक्षा बरीच चांगली होती, तरीही मिळणारा पैसा कोणाला नको असतो? त्यामुळे बोनस आणि वेतन वाढीच्या मागणीसाठी सामंतांच्या युनियनच्या मार्फत तब्बल अडीच लाख मिल कामगार आंदोलनाचे हत्यार उचलून रस्त्यावर उतरला. 1982 चा हा संप अनेक कारणाने लक्षात राहणारा होता. अडीच लाख कामगार एकजुटीने सरकारविरुद्ध आणि मिल मालकांविरुद्ध उभा राहिला.
कोणीही माघार घ्यायला राजी नव्हते. गिरणी कामगारांचा आपल्या नेतृत्वावर ठाम विश्वास होता तर राजकारण्यांच्या डोक्यात वेगळीच डाळ शिजत होती. घडणाऱ्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरत होत्या. या प्रकरणात नेमके काय झाले, ते अगदी थोडक्यात पाहू.
डॉ. दत्ता सामंतांची वाढणारी लोकप्रियता अनेक राजकारण्यांच्या डोळ्यात सलत होती. कामगारांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून कामगारांसाठी कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता अशी त्यांची छबी तयार होऊ लागली होती. त्यांनी हातात घेतलेला प्रश्न तडीस लागणार हा कामगारांचा अढळ विश्वास होता. म्हणूनच मोठ्या संख्येने गिरणी कामगार आपल्या निरनिराळ्या मागण्यांसाठी डॉक्टरांकडे डोळे लावून बसला होता.
ऐंशीच्या दशकापर्यंत मुंबई औरस चौरस वाढली होती. मुंगीला सामावून घेईल एवढीही जागा मुंबईत शिल्लक राहिली नव्हती. रियल इस्टेटवाल्यांना मुंबई दोन्ही हातांनी खुणावत होती. एकशेतीस गिरण्यांची ऐसपैस जागा म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच होती. गिरणी मालकांनाही गिरण्यांच्या जमिनीचा दिसणारा हा पैसा भुरळ घालत होता. डॉ. सामंतांचा संप यशस्वी झाला असता तर ते राष्ट्रीय राजकारणातही आपल्या डोक्यावर बसतील या भीतीने दिल्लीकरांपासून सगळ्याच राजकारण्यांची झोप उडाली होती.
अशा परिस्थितीत राजकारणी, गिरणी मालक आणि रियल इस्टेट एजंट यांच्या अनिष्ट युतीत 1982 चे आंदोलन सापडले. दोन्ही बाजूंनी संप तुटेपर्यंत ताणला गेला. अडीच लाख कामगार डॉक्टरांच्या मागे विश्वासाने उभे होते. पण उपाशी पोटी विश्वास टिकत नाही हेच खरे. हळूहळू कामगारांच्या संयमाचा बांध तुटू लागला. काही दिवसांतच संप मिटेल आणि गिरण्या पुन्हा एकदा भोंगे वाजवायला लागतील या आशेवर असलेले गिरणी कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी पुन्हा गावाकडे गेला. काही जणांनी सवय नसतानाही इतर उद्योगधंदे सुरू केले. काहींनी तर चक्क हातगाडी ढकलून संसाराचा गाडा ढकलायचा प्रयत्न केला.
तब्बल साडे अठरा महिने उलटून गेल्यानंतर ऐशी गिरण्या बंद होऊन, दीड लाख गिरणी कामगारांच्या रोजीवर गंडातर आले आणि संपूर्ण जगाच्या इतिहासातला सगळ्यात दीर्घकाळ चालणारा आणि सगळ्यात जास्त कामगारांचा सहभाग असणारा संप संपला. मुंबईतल्या गिरण्यांनी गुजरातसारख्या इतर राज्यांचा आसरा घेतला. मुंबईतला गिरणी कामगार या संपात अखेर संपला. गिरणी कामगारांबरोबरच मुंबईची शान असलेली चाळ संस्कृती नामशेष व्हायला सुरुवात झाली. हळूहळू मुंबईच्या चाळ संस्कृतीची ओळख धूसर व्हायला लागली. मुंबई नवीन शृंगार लेऊन नव्या रूपात संजू लागली.
या इतिहासाकडे मागे वळून पाहता चाळकऱ्यांच्या हृदयात न कळत एक सय येते. मुंबईचे तेव्हाचे ऐश्वर्य पुन्हा उभे राहील का? हा कधीच न सुटणारा प्रश्न त्यांच्या डोक्यात येतो. डोके फोडले तरी याचे मिळणारे नकारात्मक उत्तर त्याला या चाळ संस्कृतीच्या सुवर्णकाळाच्या इतिहासात घेऊन जाते. या सुवर्ण काळाच्या आठवणींवर उर्वरित आयुष्य नक्कीच जगता येईल हा विश्वास त्याची नाळ आजही मुंबईच्या चाळींशी जोडून ठेवतो. आज मुंबई नव्या रूपाने सजली आहे. पण चाळ संस्कृतीची मजा मात्र गेली आहे.
– डॉ. नरेंद्र कदम