कलासंपन्न, भावसमृद्ध जीवन स्त्री आणि पुरुषांनाही जगता यायला हवे. एकोणीस नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून मानला जातो. त्या निमित्ताने…
स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते’ असं सिमोन द बोव्हुआ या प्रख्यात विचारवंत लेखिकेने 1949 साली म्हटलं होतं. खरं तर स्त्री काय किंवा पुरुष काय; माणूस म्हणूनच जन्मलेले असतात. पण समाजाकडून त्यांना विशिष्ट प्रकारे घडवलं जातं. एका विशिष्ट मार्गानेच मुलग्याला वाढवलं जातं.
आदर्श पुरुषाची एक साचेबंद प्रतिमा समाजाने तयार करून ठेवली आहे. त्या प्रतिमेपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट प्रत्येक लहान मुलापुढे ठेवले जाते व त्याबरहुकूम त्याचे पालक व भोवतालचा समाज त्याच्यावर संस्कार करत असतो. त्याशिवाय चित्रपट, व्हॉट्सऍप, साहित्य, मित्र, शिक्षक इत्यादी मंडळीही त्याने कसे असायला हवे याबाबतच्या अपेक्षांचा मुलावर वर्षाव करीतच असतात.
लहान मुलांना खेळण्यासाठी बाहुली, भातुकली अशी खेळणी न देता गाड्या, पिस्तुल, गदा अशीच खेळणी दिली जातात. खरं तर मुलालाही भातुकली खेळायला आवडते आणि म्हणून तोही त्या खेळात सामील होतोच. मुलगा रडू लागला तर “रडतोस काय रडूबाईसारखा? मुलगा आहेस ना तू?’ असं त्याला म्हटलं जातं. मुलानं… पुरुषानं ओरडायचं, भांडायचं, मागे हटायचं नाही हीच शिकवण त्याला दिली जाते. अखेरीस तोही माणूसच आहे. त्याच्याही मनात कोमल, कोवळ्या भावना असणं नैसर्गिक नाही का? पण समाजाच्या दबावापुढे त्या त्याला खुडून टाकाव्या लागतात.
काही वेळा असं दिसतं की, अन्याय झाला तर एखादी बाई झटकन पुढे होऊन जाब विचारते. अशा वेळी तिच्याबरोबरचा पुरुष मात्र “जाऊ दे, कुठं भांडत बसायचं…’ असं म्हणून बचावाचा पवित्रा घेतो. मग त्याला “भागूबाई’ म्हणून चिडवलं जातं. पण मूळ स्वभाव काही पुरुष म्हणून आपण जन्माला आलो की स्त्री म्हणून, यानुसार ठरत नसतो. निसर्गानं माणूसपणाचे सर्व गुणदोष प्रत्येकामधेच दिलेले आहेत.
आपण हे समजून घेत नसल्यामुळे मृदू बोलणाऱ्या, हळवं मन असणाऱ्या पुरुषाला “बायल्या’ म्हणून हिणवलं जातं. पुरुषावर हा अन्यायच नाही का? ऍफिसमधे काम करताना कितीतरी पुरुष खालमानेनं अनेक गोष्टी सहन करायला शिकतात. घरातसुद्धा समंजसपणे काही गोष्टी सोडून देतात. पण मग अशा वेळी इतरांना वाटतं, “पुरुषासारखा पुरुष… ऐकून कसा घेतो?’ अरे म्हणजे काय? पुरुष आहे म्हणून काय त्यानं सारखं भांडखोरपणेच वागायचं? प्रेमानं, समजुतीनं वागण्याची त्याला मुभा नाही?
हे असं “कठीण कठीण किती, पुरुषहृदय बाई…’ या गाण्यात म्हटल्याप्रमाणे कठोरपणाचं ओझं पुरुष पिढ्यान्पिढ्या वागवत आला आहे. कमवून घरात आणण्याची मोठ्ठीच जबाबदारी त्याच्यावर असते. त्यामुळे व्यावहारिक शिक्षणावरच त्याला सारखं लक्ष द्यावं लागतं. मग अभिनय, संगीत, लेखन अशा गोष्टींमधे त्याला कितीही आवड असली, गती असली तरी त्यासाठी त्याला वेळ देता येत नाही. लग्न ठरवतानाच शक्यतो मुलीपेक्षा अधिक शिकलेला, जास्त कमावणारा मुलगाच जावई म्हणून स्वीकारला जातो.
मग आपोआपच संसारात तो वरचढ ठरतो. कमावत्या पुरुषाला मान, प्रतिष्ठा मिळते हे लक्षात आल्यावर तोही पैसा कमवून आणायच्या मागेच धावू लागतो. या साऱ्यात माणसाला आनंद देणाऱ्या, त्याचं आयुष्य भावसंपन्न करणाऱ्या गोष्टींपासून तो दूर जाऊ लागतो. आपल्या खऱ्या भावना दडवून ठेवण्याच्या नादात तो रुक्ष होऊ लागला. याने पुरुषाचे मोठेच नुकसान झाले.
बायका मोकळेपणानं बोलून, हसूनरडून आपल्या भावना व्यक्त करतात. अपयश आलं तरी ते त्या सहजपणे स्वीकारतात. बहुतेक वेळा मैत्रिणींचा घोळका चटकन जमतो. आपसात त्या आपली सुखदुःखं वाटून घेतात. एकमेकींच्या घरी जाणं, क्वचित राहणं, कौटुंबिक गप्पा मारणं यातून त्यांच्या भावनांचा निचरा होऊन त्या पुन्हा ताज्यातवान्या होतात. पुष्कळजणी गाण्याचे, भजनाचे, योगासनाचे… आणखी कशाकशाचे क्लास लावतात. यातून नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद मिळतो. सामाजिक देवाणघेवाण होते.
खरं तर सर्वच स्त्रीपुरुषांना अशा प्रकारे मिळून मिसळून राहण्याची गरज असते. पण प्रौढ वयात बायका जितक्या सहजपणे नवीन ओळखी करून घेतात, मैत्रिणी जमवतात; तसे पुरुषांना जमत नाही. औपचारिकतेचा अडथळा ओलांडून हृदयापर्यंत पोहोचणे त्यांना कठीण होते. कारण लहानपणापासून शिष्टासारखे वागण्याचेच धडे त्यांना मिळालेले असतात. त्यामुळे त्यांना मनमोकळेपणाने वागणेबोलणे जमत नाही. मग त्याचा ताण येऊ लागतो.
आयुष्यभर “नोकरी एके नोकरी’ करणारे पुरुष नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांना रिकामपण येते. त्यातही पत्नी जर आधी निवर्तली असेल तर ते अधिकच केविलवाणे होतात. कारण बायकोइतका हक्क त्यांना कुणावरच दाखवता येत नाही.
तिनं आयुष्यभर त्याला समजावून घेतलेलं असतं. हेच जर उलट झाले, म्हणजे पती आधी गेला आणि पत्नी हयात राहिली तर ती कुटुंबातील मुलं, नातवंडं, घरातली कामं, समवयस्क मैत्रिणी यांमधे मन रमवू शकते. पुरुषाचे तसे होत नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू “कुटुंबप्रमुख’ ही भूमिका निभावून नेण्याच्या जबाबदारीमधे कोळपून गेलेले असतात. अर्थात ही सर्वसाधारणपणे निघालेली शास्त्रीय निरीक्षणे आहेत.
ह्याला अपवादही असणारच. व्यावहारिक गोष्टींवर मात करून काही पुरुष आपला इमोशनल कोशन्ट सांभाळतातच. पूर्वी फक्त आयक्यू म्हणजे बुद्ध्यांक मोजला जात असे. आता भावनांकही आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. असेच काही पुरुष लेखनातून आपल्या नैसर्गिक भावना व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. ज्यांना कलेकडे फारच ओढा असेल, ते गायक, अभिनेता, चित्रकार होतात. पण खरं तर कलासंपन्न, भावसमृद्ध जीवन आपल्या सर्वांनाच जगता यायला यावे. यातच सुख आहे.
माधुरी तळवलकर