सागराच्या किनारी वाळूत बसून सूर्यास्त पाहणे यासारखे सुंदर काहीच नाही. आसपास नारळाच्या झाडांनी वेढलेला लांबलचक किनारा, त्यावरची पाय रूतणारी आणि पायांना चिकटून राहणारी पांढरी वाळू, नजर पोचेपर्यंत पसरलेले अथांग पाणी, वर निळे निरभ्र आकाश, लाटांची गाज आणि फारशी गजबज नसलेली शांत संध्याकाळ… असा योग जर जुळून आला तर ती संध्याकाळ संपूच नये अस वाटतं.
आकाशात उमटणाऱ्या विविध रंगांची उधळण, त्याच्या अलवार छटा, आणि दूर पलीकडे क्षितिजावर तो अलगद, सावकाश मिटणारा सूर्य हळूहळू दिसेनासा होतो आणि काळजात एक छोटीशी चमक उठते.
खरंतर रोज सूर्य उगवतो आणि मावळतोही. पण सागर किनाऱ्यावर पाहिलेला सूर्यास्त मनात असंख्य वादळे निर्माण करतो. ती संध्याकाळ उगाचच उदास होते. अंधार दाटू लागतो आणि मनावरही त्या अंधाराच दाट लेप चढतो.
काय आहे या सागराच्या पोटात आणि याअर्णवात… ही धराच पाण्याने वेढलेली आहे. पण प्रत्येक समुद्राचे पाणी वेगळे आहे. त्याच लाटा, तीच खोली, तेच अथांग पाणी परंतु पाण्याचा रंग वेगळा. कधी निळाशार, कधी थोडा काळसर तर कधी हिरवे गारही दिसते पाणी. अतिशय लोभसवाणे रूप असते या अब्धीचे.
या रत्नाकराच्या उदरात दडले तरी काय आहे? असंख्य जलचर प्राणी, तळाशी नयनरम्य कोरल्स आणि चमचमती वाळू अगदी अद्भुत दुनिया. त्याची भरती, ओहोटी, पावसाळ्यात लाटांचा तो मनोहारी पदन्यास सारेच कसे मनमोहक, मनात थोडी भीती निर्माण करणारे पण कुठेतरी सुखावणारे.
मच्छीमारांचा हा दर्या राजा म्हणजे त्यांचे दैवतच. त्यांची उपजीविका चालते त्याच्यावर. समुद्रातील मोठमोठ्या जहाजातून देश परदेशात मोठा व्यापारही चालतो. पर्यटक सागर किनारी गर्दी करतात तिथेही अनेक प्रकारचे व्यवसाय चालतात. बोटिंगची, समुद्र तळाशी जाऊन ती अद्भुत दुनिया पाहण्याची संधी मिळते.
असा हा उदधी ज्याला नद्या येऊन मिळतात. ओढे, नाले साऱ्यांना सामावून घेतो तो. पण आपली मर्यादा मात्र कधीच सोडत नाही. त्याच आपल्या जवळ असणं किंवा नसेल तर त्याला भेटायला जाणं म्हणजे आनंदाची पर्वणीच असते.
त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. सागरा सारखं विशाल मन आपल्याला करता येईल का? सर्वांना सामावून घेणे आपल्याला जमेल का. भरती आणि ओहोटी ही सुख दुःख मानून सहजपणे, त्याची अटळता लक्षात घेऊन सापेक्षपणे त्याकडे बघता येईल का? निसर्ग तुम्हाला सतत काही सांगत असतो, त्याच्या सान्निध्यात राहून माणूस म्हणून आपण जेव्हा मनाने विशाल होऊ, तेव्हा सागर, डोंगर, आकाश, झाडे वने आणि सारी सृष्टी आनंदित होईल.
…सागरा तुझ्या खाऱ्या पाण्याने तू कुणाची तहान नाही भागवू शकत, पण किनाऱ्यावर मिठागऱ्यात मीठ तयार करून पदार्थांची चव मात्र वाढवतोस नव्हे मिठाशिवाय पदार्थ पूर्ण होतच नाही.
जे जवळ नाही त्याची खंत न बाळगता, जे आहे त्याच्या उपयोग इतक्या सकारात्मक पद्धतीने करतोस. म्हणूनच तुला म्हणावेसे वाटते. सारंगा राजा सारंगा डोलकरा रे…
आरती मोने