विजय शेंडगे
अलीकडे अनेक लेखक आपापल्या बोलीभाषेत लेखन करू लागले आहेत. त्यामागे भाषाभिमान ही भावना असतेच. परंतु आपली भाषा जगली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे अशीही भावना असते. वऱ्हाडी, अहिराणी, खानदेशी, वडारी, पारधी, कोकणी भाषेत लिहिणारे लेखक दिसू लागले आहेत; परंतु त्या त्या भाषेत केलेले लेखन कितीही समृद्ध असले तरी वाचकाला त्या भाषेचे ज्ञान नसेल तर वाचक साहित्यकृती बाजूला ठेवतो.
अशावेळी निवेदनासाठी नागरभाषा आणि संवादासाठी बोलीभाषा असे समीकरण मांडले तर ते वाचकाच्या दृष्टीने अधिक सोयीचे होते. बोली भाषेचा वापर असलेले लेखन वाचताना वाचकाच्या हाती कोणतीही शब्दसूची नसते त्यामुळे लेखकाने लेखन करताना कंसात बोली भाषेतील शब्दांचे रूढ भाषेतील पर्यायी शब्द, संवादाच्या खाली रूढ भाषेतील संवाद दिले तर वाचकाच्या दृष्टीने ते अधिक सोयीचे होईल. वाचक ती बोलीभाषा समजून घेतील.
या सर्व पार्श्वभूमीवर “बिरुबाचं चांगभलं’ या मारुतराव वाघमोडे यांच्या कादंबरीकडे बघताना त्यांनी मनोगतापासून कथानकापर्यंत सगळीकडे अस्सल ग्रामीण भाषेचा वापर केला आहे. ग्रामीण बोलीत संवाद साधावा त्याप्रमाणे लेखकाने मनोगत लिहिले आहे. त्यामुळे मनोगत वाचतानाच वाचक भारावून जातो. मनोगतातील एक विधान उदाहरणादाखल घेतले तर आपल्या नेमके लक्षात येईल. मारुतराव त्यांच्या मनोगतात म्हणतात,
“उमागत्या आऊक्षात पहिल्यान्दीच आम्ही बघितल्याला आमच्या आण्णांचा त्यो मरनसोहळा आजवरच्या आऊक्षात मी केव्हाच इसरलो न्हाई.’ सामान्यतः हे वाक्य “उमगत्या आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही रडत रडत बघितलेला आमच्या आण्णांचा तो मरणसोहळा आजवरच्या आयुष्यात केव्हाच विसरलो नाही. “व्याकरणदृष्ट्या लेखकाचे लेखन चुकीचे मानले जाईल; परंतु बोलीभाषेच्या परिक्षेपात जाऊन विचार केला, तर लेखकाने अत्यंत बारकाव्याने ग्रामीण बोलीभाषेचा वापर केला आहे हे लक्षात येते.
बोलीभाषा, व्याकरणाचा आणि उच्चाराचा विधिनिषेध बाळगत नाही. त्यामुळेच “मरणसोहळा’ ऐवजी लेखकाने योजलेला “मरनसोहळा’ हा शब्दच अधिक योग्य वाटतो. “भेदरून’ ऐवजी “भेद्रुन’, “झटाझटीत’ ऐवजी “झंगाझंगीत’, “अनुभवाने’ ऐवजी “आनभवानी’, “संशय’ ऐवजी “संशेव’, “चंद्र’ ऐवजी “चंद्रुबा’, “चढाओढीने’ ऐवजी “टरीने’ असे कितीतरी अस्सल ग्रामीण बोली बाजाचे शब्द या कादंबरीत येतात आणि नेटाने वाचणाऱ्या वाचकाला समृद्ध करतात.
कथानकात फारसा वेगळेपणा नसला तरी बोलीभाषेचा वेगळेपणा या साहित्यकृतीचं महत्त्व अधोरेखित करतो. उत्तम वातावरण निर्मिती, ओघवती वर्णने, प्रवाही घटनाक्रम ही या कादंबरीची बलस्थाने आहेत. मृत होऊ लागलेले कितीतरी शब्दांचा लेखकाने चपखल वापर केला आहे. डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या प्रस्तावनेतून कथानकाचा गाभा वाचकाच्या लक्षात येतो. सुडाचं कथानक, बोलीभाषेचा वापर यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. परंतु नेट लावावा लागतो हे नक्कीच.