साधारणपणे दसरा झाला की, ऊसतोडणीच्या कामाला सुरुवात होते. हे काम करणारे बहुतेकजण शेतमजूर असतात. दसऱ्यानंतर शेतातली कामं संपलेली असतात त्यामुळे आता शेतमजुरीची कामं मिळेनाशी होतात. मग नवरा “जगायला, पोट भरायला’ दुसऱ्या गावी मजुरीसाठी जातो. पुरुषमाणूस उन्हातान्हात राबणार, परक्या गावात हातानं करून खाणार आणि बायको मुलांना सांभाळत घराच्या सावलीत बसणार हे कसं चालणार? म्हणून मग दोघं नवराबायको शेताच्या ठिकाणी जातात. लहान मुलंही बरोबर घेतली जातात.
मोठ्या मुलांची शाळा चालू असेल तर ते गावी राहू शकतात पण मुलींना कसं ठेवणार? म्हणून मग आठवी-नववीतच त्यांचं शिक्षण बंद करून सहा महिन्यांसाठी त्यांनाही बरोबर घेतलं जातं. ऊस-तोडणीसाठी एकेक जोडपे घेतले जाते. एक जोडपे म्हणजे एक कोयता असे म्हटले जाते. शेतकऱ्याचे बोलणे मुकादमाशी होते. मुकादम लहानलहान गावातून अशी जोडपी गोळा करतो. नवरा ऊसात शिरून कोयत्यानं सपासप ऊस कापून त्याचं पाचट फेकून देतो आणि ऊस बाजूला टाकत राहतो.
बायको सगळे ऊस गोळा करते. ऊस गोलाकार असल्यामुळे त्यांची मोळी बांधणं किचकट काम असतं. ते अर्थातच बाईवर टाकलं जातं. त्याची मोळी करून ट्रक, ट्रॅक्टर जे काही असेल त्यात ती मोळ्या भरते. ढीग वाढत जातो. मग शिडीवरून कसाबसा तोल सांभाळत जडच्याजड मोळी घेऊन ती वरपर्यंत जाते आणि ती मोळी ट्रकमधे चढवते. अक्षरशः पस्तीस किलो वजनाची कृश बाई पस्तीस किलोचीच मोळी डोक्यावर घेऊन शिडी चढते.
उसाचं वजन जेवढं जास्त भरेल तेवढा शेतकऱ्याला पैसा जास्त मिळतो. म्हणून ऊस ट्रकात भरेपर्यंत उसाला पाणी पाजलं जातं. शेतात, शेताभोवती पाणीच पाणी. जवळच बांधलेल्या तात्पुरत्या झोपडीतली जमीन ओली. पोरांना खेळायला जागा नाही. ओल्या ठिकाणी चूल पेटत नाही. लाइट, पाणी यांची कसलीही सोय नसते. या सगळ्या अडचणींना तोंड देत मजूर बाई भल्या पहाटे उठून चहाचपाती करते. दिवसभर कष्ट करते आणि रात्री स्वयंपाक रांधून जेवायला घालते.
झोपडी बांधताना त्यात मुख्यतः वाळलेलं पाचट, चिपाडं यांचाच भरणा असतो. दसरा-दिवाळीनंतरचे दिवस थंडीचे असतात. कधीकधी चूल पूर्ण न विझवता त्या ऊबेत थकली-भागली माणसं झोपतात. कधी मूल रांगत चुलीपाशी जातं, भाजतं. कधी ठिणगी एखाद्या वाळलेल्या पाचटावर पडते आणि बघताबघता झोपडी पेट घेते. कमावलेले सगळे आगीत जळून भस्म होते. चिमणी, कंदील लवंडतो, झोपडी पेटते. कधी माणसं त्या जाळात अडकतात. कुठंतरी बारीकशी बातमी येते. आपण ती वाचतो आणि विसरून जातो.
अगदी अलीकडेच “ऊसतोड महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरूच’ अशी एक बातमी वृत्तपत्रात वाचली. बातमी अशी होती की, तरुण ऊसतोड महिला मजुरांचे गर्भाशय काढून टाकण्याच्या 650 शस्त्रक्रिया बीडमधे 2020-21 या वर्षामधे झाल्या. ऊसतोडणीला जाण्यापूर्वी बीड जिल्ह्यातील महिलांची गर्भाशय पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होतात.
बाईच्या शरीराचा पुरेपूर उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी करून घेणं हे तर आपल्याकडे पूर्वापार चालत आलं आहे, पण काही वर्षांपूर्वी ऊसतोडणीसाठी जायच्या वेळीच दिवस गेल्याचे लक्षात आले तर ते मूल क्युरेटिन करून काढून टाकण्याचं ऑपरेशन केलं जात असे. हाही स्त्रीच्या आरोग्याशी खेळच; पण आता काळ बदलला. आधुनिक झालो आपण. त्यामुळे बाईकडून हवी तेवढी दोनतीन मुलं झाली की, काय गरज त्या गर्भाशयाची?
पंधराव्या वर्षी मुलीचं लग्न होतं. विशीपर्यंत दोनतीन मुलं होऊन जातात. मग ती आख्खी पिशवीच काढून टाकायची. म्हणजे मूल होऊ नये म्हणून काळजीही घ्यायला नको आणि दिवसही जायला नको. जन्मभर फुकटचा मजूर राबायला मोकळा, पण हे तरी साध्य होतं का? नाही होत. कारण शरीरात गर्भाशयाची पिशवी असणं म्हणजे स्त्रीत्वाचं कवच. ते गेलं की, बाईचं बाईपणच सरतं. ती म्हातारी होते. नाना दुखणी मागे लागतात. थकवा येतो. सारखा डॉक्टर लागतो, पण हे सगळं नंतर कळतं. आधी त्या बाईला स्थानिक डॉक्टरच गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचा सल्ला देतो. त्यानंतर येणाऱ्या तिच्या आजारपणाकडे सगळेच दुर्लक्ष करतात.
चार हजार वस्तीच्या गावात शंभरजणींची गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्याचं सर्व्हेमधे लक्षात आलेलं आहे. एका छोट्या गावात तर सगळ्याच बायकांची अशी ऑपरेशन्स झालीत. निसर्गानं स्त्रियांना दिलेलं संरक्षण अचानक काढून फेकून दिलं जात असल्यामुळे ऐन तारुण्यात बायका म्हाताऱ्या होतात. वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच त्यांच्या सगळ्या इच्छा मरून जातात. जेवण जात नाही. अंगदुखी तर कायमचीच मागे लागते. बाईच्या आरोग्याशी अशा प्रकारे खेळ करण्यामागे फार मोठं अर्थकारण दडलेलं आहे.
काही मुकादम तर जसं ऊसतोडणी कामगार पुरवण्याचं कंत्राट घेतात, तसं बायकांचं गर्भाशयाचं ऑपरेशन करण्याचंही कंत्राट घेतात. मुकादम आधी डॉक्टरशी बोलतो. मग बायकांना सांगतो की, जास्त बायका आणल्या तर खर्चात सवलत मिळेल. दहा बायका एका वेळी ऑपरेशनला डॉक्टरकडे आणतो. बाईकडून वीस हजार रुपये घेतो. डॉक्टरला पंधरा हजारात पटवतो. पन्नास हजार मुकादमाच्या खिशात. सगळ्यांचाच धंदा होतो. बाईचा मात्र जीव जातो.
या प्रश्नात आता सामाजिक संस्था लक्ष घालू लागल्या आहेत. ऊसतोडणीस जाण्यापूर्वी महिलांची आरोग्य तपासणी करणे वगैरे काही नियम आता शासनाने लागू केले आहेत. अलीकडेच या कामगारांची नोंदणी करणारे ऍप तयार करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. यामुळे तरी ऊसतोड महिलांचे जीवनमान सुधारेल का?
माधुरी तळवलकर