उरुळी कांचन, -करोना महामारीच्या लॉकडाउननंतर जवळजवळ एक ते दीड वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांच्या नावाखाली जवळजवळ 80 टक्के रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. त्यामध्ये गरीब व सर्वसामान्य प्रवाशांच्या गाड्या मात्र अद्यापपर्यंत तरी बंदच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही सेवा सर्वसामान्यांसाठी कोसो दूर असल्याचे चित्र आहे.
दौंडवरून पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी दोन तर संध्याकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास एकच डेमो सुरु आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस दौंड या ठिकाणावरून केडगाव, पाटस, यवत उरुळी कांचन, लोणी काळभोर या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना जास्त प्रमाणात पैसे देऊन पुणे-सोलापूर महामार्गावरून अजूनही यावे लागत आहे. त्यामुळे पुणे ते दौंड, दौंड ते पुणे व सोलापूरच्या बाजूने येणारी सोलापूर पॅसेंजर सुरु करण्याची मागणी प्रवासी करू लागले आहेत.
महामारीनंतर हळूहळू सर्व काही व्यवस्थित सुरू होत असताना रेल्वे गाड्या बंद का, असा सवाल मात्र सर्वसामान्य प्रवाशांकडून विचारला जाऊ लागला आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सर्वसामान्यांसाठी डेमो पॅसेंजर सुरू करावी. ही गाडी कमी उत्पन्नाच्या गटातील प्रवासासाठी सोयीची असल्याने तसेच नेहमी प्रवासासाठी सर्वाधिक वापरासाठी वापरली जाते.
रेल्वेवर उपजीविका असणारे फळ विक्रेते, पाणी विक्रेते, हॉटेल चालकांची हेळसांड होत आहे. सोलापूर- पुणे पॅसेंजर गाडीचे रेल्वे खात्यास आर्थिक उत्पन्न जास्त मिळते. राज्य शासनाने पुणे-सोलापूर पॅसेंजर सुरू करावी, असे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील प्रवासी करू लागले आहेत.
दरम्यान, सोलापूर-पुणे व पुणे-सोलापूर डेमो पॅसेंजर गरिबांचा रथ म्हणून ओळखली जाते. सोलापूर ते पुणे व पुणे ते सोलापूर रेल्वे पॅसेंजर गाडी सुरू केल्यास करमाळा, परांडा, जामखेड, कुर्डूवाडी तसेच सोलापूर परिसरातील सामान्य लोकांना पुणे, दौंड, उरुळी कांचन, केडगाव, पाटस, भिगवण व छोटी स्टेशन या ठिकाणी उपजीविकेसाठी जावे लागते. प्रवास करण्यासाठी अद्याप रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सर्व रेल्वे गाड्या सुरु करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
करोना पूर्णतः गेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून अधिकच्या फेऱ्या वाढविण्याबाबत निर्णय झाला नाही. जोपर्यंत केंद्र सरकारचा आदेश येत नाही. तोपर्यत दुपारच्या गाड्या सुरु करू शकत नाही. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय सर्वसामान्य प्रवाशांसाठी डेमू सेवा सुरु आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांच्यासाठी तिकीट सेवा उपलब्ध आहे. केंद्र सरकारकडून निवेदन आल्यास त्याप्रमाणे हळूहळू गाड्या सुरु करण्यात येणार आहेत.
– मनोज झंवर, रेल्वे प्रशासन जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग.
रेल्वेच्या पॅसेंजर व डेमो गाड्या सुरु करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नागरिकांच्या मागणीचा विचार करता रेल्वे विभागाशी चर्चा करून सर्वसामान्यांसाठी आवश्यक असणाऱ्या रेल्वे गाड्या सुरु करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भेटून रेल्वेच्या पॅसेंजर व डेमो गाड्या सुरु करण्याबाबत चर्चा करणार आहे.
– अजिंक्य कांचन, क्षेत्रीय रेल्वे समिती सदस्य, उरुळी कांचन.