मरणात खरोखर जग जगते।
अधिं मरण अमरपण ये मग ते।।
असं कविवर्य भा. रा. तांबे म्हणून गेले आहेत. मृत्यूनंतरच माणसाला अमरत्व प्राप्त होतं, असं त्यांना म्हणायचं आहे. अर्थात, हे अमरत्व प्राप्त होण्यासाठी आधी मृत्यू आवश्यक आहे. माणूस मेल्यानंतरच त्याचं महत्त्व आपल्याला कळतं आणि आपण त्याची स्मृती आळवत बसतो. त्यामुळेच त्या स्मृतिरूपानं माणूस अमरत्वाला पोचतो.
अनेक कवी, लेखक आणि विचारवंतांनी मृत्यूबद्दल आपले वेगवेगळे विचार व्यक्त केले आहेत. बहुतेकांनी मृत्यूकडे विशाल दृष्टिकोनातून पाहायला सुचवलं आहे. आज खरं तर अशाच विचारांची गरज आहे. करोनाच्या महाभयंकर साथीमुळे आपण आजूबाजूला अनेक जण मृत्युमुखी पडलेलं पाहिलं आहे. आपले काही आप्त, मित्र-मैत्रिणी हे या रोगाला बळी पडलेले आहेत. या बऱ्याचशा अनपेक्षित आणि दु:खद घटनांनी मन शोकाकुल होणं साहजिक आहे. परंतु अशा खूप घटना जवळपास घडल्यामुळे आपली दु:खाची भावना काहीशी बोथट झाली आहे. म्हणजेच मृत्यूची अनिवार्यता आणि जीवनाची अशाश्वती याची सखोल जाणीव आपल्याला झाली आहे.
नेमकं हेच अनेक विचारवंतांनी ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. दुर्दैवानं याची जाणीव होण्यासाठी ही महामारी कारणीभूत ठरली. खरं तर भगवद्गीतेतही म्हटलं आहे :
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्ये।र्थे न त्वं शोचितुमर्हसि।। (2.27)
म्हणजे ज्या व्यक्तीनं जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. तो आयुष्यात कोण होईल, त्याचं काय होईल हे काहीच सांगता येत नाही. मात्र, एकच गोष्ट छातीठोकपणे सांगता येते की ती व्यक्ती (केव्हा ना केव्हा तरी) मृत्यू पावणार आहे. त्यामुळे जी गोष्ट टाळता येण्यासारखी नाही त्याविषयी शोक करण्यात काय अर्थ आहे. तसंच ज्याप्रमाणे जन्माला आलेल्याचा मृत्यू अटळ आहे त्याचप्रमाणे मृत्यू पावलेल्याचा पुनर्जन्म निश्चित आहे, असंही या श्लोकात सांगितलं आहे.
सजीवाच्या जाणिवेचा (कॉन्शसनेस) अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी मृत्युपश्चात् जाणीव विश्वात कुठेतरी अस्तित्वात असण्याची शक्यता पुंजवादाचा (क्वांटम थिअरी) दाखला देऊन व्यक्त केली आहे. अवर डिस्टंट कझिन्स या इंग्रजी विज्ञान कादंबरीत (2013 मध्ये जर्मनीत प्रकाशित) वरवर अप्रगत वाटणाऱ्या परंतु ज्ञानी असलेल्या मंगळवासीयांनी याविषयीचा खुलासा केलेला दाखवला आहे.
ते सांगतात की मृत्यू व पुनर्जन्म म्हणजे कीटछिद्रातून (वर्महोल) आपल्या विश्वातून अतिदूरच्या दुसऱ्या विश्वामध्ये होत असलेला प्रवेश होय. वैज्ञानिक किंवा काल्पनिक स्पष्टीकरण काहीही असो, मृत्यू म्हणजे सजीवाच्या अस्तित्वचक्रामधील एक स्थित्यंतर आहे असंच बहुतांश विद्वानांना वाटत आहे.
महान नाटककार शेक्सपिअरनं त्याच्या “सिंबेलाइन’ या नाटकात “फिअर नो मोअर द हीट ऑफ द सन…’ असं मृत्यूवर भाष्य केलं आहे. त्यात त्यानं मृत्यूमुळे तुला (मृत पावलेल्याला) आता सूर्याचा ताप तसंच शीतकालातील थंडी यांचा सामना करण्याची अजिबात जरुरी नाही, असं म्हटलं आहे.
जॉन डन या दुसऱ्या इंग्रजी कवीनं थेट मृत्यूलाच “डेथ बी नॉट प्राउड’ असं खडसावलं आहे. हे मृत्यू, तू केवळ शरीरातून आत्म्याला मुक्त करणारा अभिकर्ता किंवा हस्तक आहेस- तू आत्म्याला काहीही करू शकत नाहीस, तू निष्प्रभ आहेस, असं हा कवी आपल्या “सॉनेट’मध्ये (सुनीत) म्हणतो. भगवद्गीतेतही
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता
वा न भूय्ः।
अजो नित्यः शाश्वतो।यं पुराणो न हन्यते
हन्यमाने शरीरे।।
हाच विचार मांडला आहे की, आत्म्याला आदी किंवा अंत नाही आणि तो शाश्वत आहे. म्हणजेच मृत्यूही आत्म्याला नष्ट करू शकत नाही.
जवळची व्यक्ती परलोकवासी झाल्यावर अर्थातच दु:ख होणं स्वाभाविक आहे कारण आपले ऋणानुबंध त्या व्यक्तीशी जुळलेले असतात. परंतु मृत्यूची अनिवार्यता ध्यानात घेतली आणि तो सजीवांच्या विशाल अशा अस्तित्वचक्राचा मात्र एक दुवा आहे हे पटलं की वेदनांची तीव्रता नक्कीच कमी होईल.
साक्षात मृत्यूला निर्भयतेने सामोरे जाणारे क्रांतिकारक आणि आपले शूर सैनिक यांना डोळ्यासमोर ठेवलं तर मृत्यूचं भय आणि घृणा नाहीशी व्हायला मदत होईल.
श्रीनिवास शारंगपाणी