शिरूर – करोना विषाणूच्या भीतीमुळे राज्यातील व परप्रांतीय कामगार आपापल्या गावी परतल्याने रांजणगाव एमआयडीसी, परिसरातील हजारो खोल्या रिकाम्या झाल्याने खोलीमालक आर्थिक अडचणीत आले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून परिसरातील अर्थकारण कोलमडून गेले आहे. सुमारे तेरा हजार खोल्या असून यातील अकरा हजार खोल्या ओस पडल्या आहेत. तीन महिन्यांत खोली मालकांना 11 कोटी 55 लाख रुपयांचा जबर फटका बसला आहे. त्याचा परिणाम खोली मालक, किराणा दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आदी घटकांवर झाला आहे. परप्रांतीयांच्या कामावर अर्थकारणाचा पाया असलेल्या परिसरात सन्नाटा पसरला आहे.
करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात (दि.24) मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. यानंतर अनेक उद्योग धंद्यासह कंपन्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे कामगारांना रुमवर थांबावे लागले. बहुतांश कामगारांनी आपापल्या गावी जाणे पसंत केले. त्यामुळे रांजणगाव एमआयडीसी परिसरातील खोल्या सध्या ओस पडल्या आहेत. खोल्या कामगारांना भाड्याने देता याव्यात म्हणून अनेकांनी विविध बॅंकांकडून कर्ज काढून खोल्या बांधल्या आहेत. आता भाडेकरू कामगार गावी निघून गेल्याने खोलीमालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रांजणगाव गणपती, रांजणगाव एमआयडीसी, ढोकसांगवी, कारेगाव व कर्डेलवाडी आदी गावांत जवळपास तेरा हजारांहून अधिक खोल्या आहेत. यातील जवळपास 80 टक्के खोल्या सध्या रिकाम्या धूळखात पडल्या आहेत. रांजणगाव परिसरात झपाट्याने वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे महाराष्ट्रासह परराज्यातील कामगारांचे हे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांच्या आसपास आहे. हे भाडेकरू कामगार रांजणगाव परिसरातील गावांमध्ये भाड्याने रुम घेऊन राहत होते. मार्च व एप्रिलनंतर कामगारांनी आपला मोर्चा गावी जाण्याकडे वळविला आहे.
रांजणगाव एमआयडीसी परिसरातील रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगाव व कर्डेलवाडी येथे जवळपास तेरा हजारांहून अधिक खोल्या भाड्याने आहेत. लॉकडाऊन असल्याने बहुतांश कामगार गावी परतल्याने खोल्या रिकाम्या आहेत. त्यामुळे बहुतांश खोलीमालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आम्ही एप्रिल व मे महिन्यांचे रुमभाडे बहुतांश मजुरांना सामाजिक बांधिलकी म्हणून माफ केले आहे.
– ज्ञानेश्वर पाचंगे,
खोलीमालक, ढोकसांगवी.
परप्रांतीयांमुळे चक्र थांबले, उदरनिर्वाहच अडचणीत
रांजणगाव येथील एमआयडीसीतील विविध कंपन्यात, गोडाऊनमध्ये काम करणारे हे कामगार खोली भाड्याने घेऊन राहत होते. यात परराज्यातील कामगारांची संख्या मोठी आहे. या एका खोलीला बावीसशे ते पाच हजार रुपयांपर्यत भाडे महिन्याला आकारले जाते. परिसरात जवळपास तेरा हजारांपेक्षा अधिक खोल्या आहेत. या खोल्यांच्या व्यवसायामुळे महिन्याला सुमारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मार्चपासूनच्या लॉकडाऊनमुळे बहुतांश कंपन्या व उद्योग धंदे बंद असल्याने खोल्यांमधील भाडेकरू कामगार आपापल्या गावी परतल्याने 80 टक्के खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. अनेकांची उपजीविका या भाड्यांच्या खोल्यांवर असल्याने खोलीमालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.