करोनाच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा ‘रोल, कॅमेरा, ऍक्शन’साठी सज्ज झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग आता पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे.
विशेष बाब म्हणजे ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘टोटल हुबलाक’ या दोन मालिकांच्या चित्रिकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे. सह्याद्रीचं विस्तीर्ण आणि दाट खोरं, निसर्गाची मुक्तहस्ते उधळण, बाराही महिने संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचा काठ, शंभरहून अधिक हेमाडपंथी मंदिरे, नागमोडी रस्ते आणि दुतर्फा हिरवाईचं सौंदर्य यामुळे सातारा म्हणजे चित्रपटसृष्टीसाठी पोषक वातावरण असलेला जिल्हा.
मुंबईमध्ये जे काही मिळत नाही आणि जे कृत्रिम पद्धतीने तयारही करता येत नाही ते सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीने भरभरुन दिल्यामुळे निसर्गतःच उपलब्ध आहे. जिल्ह्यातील विशेषतः पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यांमधील काही ‘लोकेशन्स’ निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.
जिल्ह्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने शूटिंगसाठी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या पातळीवर तयार केलेली ‘एक खिडकी योजना’ ही निर्मात्यांना सोयीची वाटते. त्याचसोबत फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक, सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन, वुमन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टिस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती होते.
चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या स्थानिक कलाकारांना मिळालेली संधी, कलाकारांना दळण-वळणासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था, सर्वांना जेवणासाठी सातारी केटरर्स या माध्यमांतूनही अनेक तरुणांच्या हाताला काम मिळते. चित्रिकरण आहे त्या गावाला स्थानिक विकासाला मदत, चित्रिकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक मदत यामुळे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते.
चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रिकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये झालेली लक्षणीय वाढ, असे विविध फायदे जिल्ह्याला मिळत आहेत हे सातारा जिल्ह्यात झालेल्या चित्रीकरणावरून दिसत आहे. जिल्ह्यातही स्थानिक पातळीवर चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, गायक, वादक, लेखक यांच्या रुपाने हिरे उपलब्ध झाले. यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे, किरण माने, श्वेता शिंदे पटकथा लेखक प्रताप गंगावणे, अरुण गोडबोले, तेजपाल वाघ हे मान्यवरही याच मातीतील आहेत.
करोना प्रादुर्भावामुळे चित्रपटसृष्टीचे क्षेत्र मोडकळीस आले आहे. या व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रिकरणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन परवानगी दिली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातीला हा पहिला निर्णय ठरला आहे. अनेक निर्माते आता सातारची वाट धरत असल्याने इथे रोजगार निर्माण होणार आहे. कलाक्षेत्रातील हा सातारा पॅटर्न चित्रपट क्षेत्रातील सर्वांसाठी आशादायक ठरत आहे.
तेजपाल वाघ (पटकथाकार)
होय, तुम्ही सातारा जिल्ह्यात कुठेही शूटिंग करू शकता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. केवळ आता चित्रपट-मालिका क्षेत्रातील सर्व निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. लवकरात लवकर या आणि आता कास, ठोसेघर, बामणोलीच्या दर्याखोऱ्यात तसेच माण खटावच्या माळरानांमध्ये पुन्हा एकदा आवाज घुमूद्यात, “लाईट, कॅमेरा, ऍक्शन…’ !!!
किरण माने (अभिनेते)