अवसरी -वरची टाव्हरेवाडी (घुली) अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे गेल्या पंधरा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना डोक्यावर पाणी वाहून आणावे लागत आहे. वरची टाव्हरेवाडी (घुली) येथे 03 जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठीच्या असणाऱ्या विहिरीचा वीजपुरवठाही बंद झाला. त्यानंतर गावातील सर्व वाड्यावस्त्यांवरील वीजपुरवठा सुरळीत झाला; परंतु या भागातील वीजपुरवठा अद्याप देखील खंडित असल्याचे येथील महिलांनी सांगितले.
आज होईल उद्या होईल या आशेवर वाडीतील लोक 3 जूनपासून आजपर्यंत ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट करीत आहेत. सुमारे चाळीस घरांची वस्ती गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्यावाचून वंचित आहे. माणसांना पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी लागणारे पाणी महिलांना आणि पुरुषांना डोक्यावर वाहून आणावे लागत आहे.
अनेक भागात वीजवाहक तारांना झोळ पडला आहे, त्याची देखील दुरुस्ती त्वरित व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रासलेल्या या महिलांनी केली आहे.