मुंबई -भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या संपूर्ण मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता तो थेट आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठीच संघात पुनरागमन करेल असेच चित्र दिसत आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीतील पराभवानंतर रोहितनेच बीसीसीआयकडे विश्रांती मागितली होती. बीसीसीआयने देखील वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितसह विराट कोहलीलाही विश्रांती देण्याचे जवळपास निश्चित केले होते व संघाची धुरा कसोटी मालिकेपुरती अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात येणार असल्याचेही सांगितले होते.
रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाला फारसे यश हाती लागलेले नाही तसेच त्याची वैयक्तिक कामगिरीही सुमार झालेली आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देत आशिया करंडक तसेच त्यानंतर भारतातच होत असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी तो ताजातवाना राहावा असेही ठरवण्यात आले होते.
आता भारतीय संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका खेळणार आहे ज्यामध्ये 24 जुलैपर्यंत दोन कसोटी सामने खेळवले जातील. यानंतर 1 ऑगस्टपर्यंत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. 13 ऑगस्टपर्यंत भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.
यानंतर 31 ऑगस्टपासून आशिया करंडक स्पर्धा सुरू होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ 14 ते 31 ऑगस्टदरम्यान आयर्लंड विरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. यातही रोहितला विश्रांतीच दिली जाणार आहे. आशिया करंडक स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.
खेळाडूंच्या विश्रांतीवर प्रसाद यांची टीका
संघातील प्रमुख खेळाडू जर असे सातत्याने विश्रांती घेत राहिले तर वेगळाच पायंडा पडेल, अशा शब्दात भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी टीका केली आहे. खेळाडूंना सातत्याने सामने खेळावे लागतात हे मान्य आहे; परंतु रोटेशननुसार खेळाडूंना संधी दिली तर अशी वारंवार विश्रांती देण्याची गरज निर्माण होणार नाही, असेही प्रसाद म्हणाले.