मुंबई – भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातानंतर दुखापतग्रस्त झाला आहे. तंदुरुस्त होण्यासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये घाम गाळत आहे आणि त्याच्या प्रकृतीमधील जलद बदलामुळे बीसीसीआय आणि बंगळुरू येथील एनसीएमधील वैद्यकीय अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत.
गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या भीषण कार अपघातातून वाचल्यानंतर पंतचे पुनर्वसन सुरू आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, बीसीसीआय पंतच्या पुनर्वसनाचा वेग वाढवण्याचा आणि त्याला या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, 2023 मध्ये कोणताही क्रिकेट सामना खेळणे पंतसाठी कठीण असेल. नुकतेच त्याने कुबड्यांशिवाय चालण्यास सुरुवात केली आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय पायऱ्या चढण्यास सुरुवात केली आहे.
जसप्रित बुमराह आणि श्रेयस अय्यर या दोघांच्याही पाठीवर नुकत्याच शस्त्रक्रिया झाल्या होत्या, ज्यामुळे ते आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला मुकले होते आणि आता ते बरे होण्यासाठी एनसीएमध्ये आहेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपसाठी दोन्ही खेळाडू उपलब्ध असल्याबद्दल एनसीए वैद्यकीय कर्मचारी आशावादी आहेत.
बुमराहच्या पाठीवर मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली. गेल्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या घरच्या टी-20 सामन्यानंतर तो खेळलेला नाही. श्रेयसला त्याच्या मणक्याच्या खाली त्रास झाला आणि मार्चमध्ये अहमदाबादच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम कसोटीला तो चुकला. त्यानंतर मे महिन्यात त्यांच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे.