मुंबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा पार पडल्यानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची नियुक्ती केली जाणार आहे. कोहली या स्पर्धेनंतर टी-20 संघाचे नेतृत्व सोडणार असून रोहितच्या नावाची घोषणा स्पर्धा संपल्यावर लगेचच करण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
कोहलीने नेतृत्व सोडल्यानंतर त्याच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाणार हा प्रश्न सातत्याने चर्चिला जात होता. रोहितसह लोकेश राहुल आणि ऋषभ पंत हे पर्याय होते. मात्र, सध्या रोहितच क्रिकेटच्या या प्रकारात भारताचा उपकर्णधार असल्याने तसेच कोहलीच्या अनुपस्थितीत त्याच्या नेतृत्वाखालील संघाने सरस कामगिरी केली आहे. ते पाहता रोहितच या पदाचा सर्वात मोठा दावेदार होता.
सध्याच्या संघात रोहित कोहलीच्या बरोबरीने वरिष्ठ खेळाडू मानला जातो. त्यामुळे कोहलीच्या जागी त्याचीच नियुक्ती केली जाणार असल्याचे संकेतही बीसीसीआयने दिले आङेत.
कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसीच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2017 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 सालची एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा व यंदा झालेली आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा या महत्त्वाच्या स्पर्धा खेळल्या व त्यात भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आले होते.