नवी दिल्ली – रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आजवरचा इतिहास पाहिला, तर आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत केवळ याच दोघांवर अवलंबून राहणे भारतीय संघाला महागात पडेल. न्यूझीलंडविरुद्धच्या या लढतीतही कोहली व रोहितबाबत चित्र बदललेले नसेल, अशा शब्दांत माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक दीपदास गुप्ता याने टीका केली आहे.
आयसीसीच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये रोहित आणि विराट हे दोघेही अपयशी ठरले आहेत. आयसीसीच्या 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत रोहित आणि विराट यांना चांगली खेळी खेळता आली नव्हती. त्याचबरोबर 2019 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही रोहित व विराट यांना धावा करता आल्या नव्हत्या. हा सामना न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळवण्यात आला होता. या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये रोहित आणि विराट अपयशी ठरले होते, अशी उदाहरणेही त्याने दिली आहेत.
आकडेवारीकडे पाहिले तर हे सिद्ध होते की, हे दोन्ही खेळाडू महत्त्वाच्या सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलेले नाहीत. सध्या रोहित आणि विराट हे याबद्दल विचार करत नसतील, पण त्यांनी ही आकडेवारी पाहावी असे मला वाटते. हे आकडे निराश करणारे आहेत. कारण मोक्याच्या क्षणी भारतीय खेळाडू अपयशी ठरताना दिसत आहेत. या गोष्टीचा नक्कीच विचार करायला हवा, पण या गोष्टीचे दडपण मात्र घेता कामा नये, असेही तो म्हणाला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 18 जूनला इंग्लंडमध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आलेला आहे. भारताच्या संघातील सर्व अनुभवी खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता हा सामना कोण जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्या नेतृत्वावरही सर्वांचे लक्ष असेल.