- कारवाई शून्य : कुणाचेही नियंत्रण नाही
पिंपरी – दिवाळी निमित्ताने गावी जाणाऱ्या नागरिकांकडून खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून जादा तिकीट आकारले जात आहे. अवघ्या चार दिवसावर दिवाळी आली आहे. यामुळे गावी जाणाऱ्या नागरिकांकडून याचाच फायदा घेत तिकीट दर जादा आकारत प्रवाशांची लूट सुरु केली आहे. ऑनलाइन तिकीट बुकींगला कमी दराने तर, थेट एजंटकडून प्रवासी बघून वेगळे दर आकारले जात आहेत. यावर, आरटीओ कार्यालयाकडून लक्ष ठेवले जाते मात्र, अद्याप कुणावरही कारवाई झालेली नसल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांना फावते आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांना आपल्या घरी जावे लागते. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून घेतला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नोकरी व व्यवसायानिमित्ताने राज्यातील व परराज्यातील नागरिक स्थायिक झाले आहेत. मात्र, सणासुदीला घरी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. याचाच फायदा खासगी ट्रॅव्हस संचालकांकडून घेतला जात आहे. ऑनलाइन बुकींग केल्यास नागरिकांना तिकीट दर कमी तर, एजंटाच्या माध्यमातून तिकीट बुक करणाऱ्यांना मनमानी भाव लावला जात आहे.
तीन पथकांची नियुक्ती
नियमानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या दरापेक्षा खासगी ट्रॅव्हल्स चालकांना दीडपट दर आकारता येतो. मात्र, त्यापेक्षाही जादा दर आकारले जात असून काही एजंटाकडून दुपट्टीने तिकीट आकारले जात आहे. यावर नियत्रंण ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तीन पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही.
तक्रार करण्याचे आवाहन
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना विचारले असता ते म्हणाले की, वाढीव तिकीटाबाबत कुणी जाता तिकीट आकारत असेल तर, आरटीओच्या संकेतस्थळावर तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.