सातारा – भुयारी गटार योजनेमुळे खराब झालेल्या रस्ता दुरुस्तीला पालिकेने मुहूर्त शोधला आहे. खुदाई पूर्ण झालेल्या शहराच्या पश्चिम भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती प्रस्तावांना पालिकेने हिरवा कंदिल दिला आहे. पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या प्रशासकीय सभेत एकूण 63 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक अभिजित बापट होते.
अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शाहू चौक ते बोगदा या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. या सभेत शाहू चौक ते बोगदा तसेच भुयारी गटार योजनेमुळे दुरवस्था झालेल्या शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला नगर अभियंता दिलीप चिद्रे, लेखा परीक्षक कल्याणी भाटकर, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे, स्थावर विभागप्रमुख प्रणिता शेंडगे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सभा अधीक्षक अतुल दिसले यांनी अजेंड्यावरील 63 विषयांचे तपशीलवार वाचन केले. यानंतर मुुख्याधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांनी सर्वच विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या प्रमुख विषयांना मंजुरी
दरे, शाहूपुरी, करंजे, खेड, गोडोली, विलासपूर, शाहूनगर व त्रिशंकू भागात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी चालक व मजुर पुरविणे, हद्दवाढ भागात वीजेसाठी नवीन पोल व एलईडी दिवे बसविणे, आयुर्वेदिक गार्डनमध्ये खेळणी बसविणे, अजंठा चौक उड्डाणपुलाखालील जागा विकसित करणे, शहरातील मुख्य रस्त्यांना थर्मोप्लास्ट पेंट मारणे, शहरातील खुल्या जागा, दुभाजक व चौकांचे सुशोभीकरण करणे आदी विषय सभेत मंजूर करण्यात आले.