मुंबई : मोटार वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत ’31वे रस्ता सुरक्षा अभियान 2020′ साजरा करण्यात येणार आहे.
वाहन चालवत असताना नियमांचे उल्लंघन होऊ नये. निष्काळजीपणे वाहन चालविल्याने चालकासोबत प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. म्हणून अपघात रोखण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय शिक्षण विभाग व इतर संबंधित संस्था व संघटना यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी जनजागृती व जनप्रबोधनाकरीता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीने रस्ता सुरक्षा अभियान 2020 करिता जिल्ह्यातील अंमलबजावणी व नियोजनाबाबत समितीची बैठक घेऊन संबंधितांना निर्देश देण्यात यावे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावे, असे आवाहन गृह (परिवहन) विभागाद्वारे करण्यात आले आहे.