खेडशिवापूर – पंढरपूर-महाड राज्य महामार्ग हद्दीतील वरंधा घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका असल्याने रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवार (दि. 1) पासून सर्वप्रकारच्या अवजड वाहनांना घाटातून प्रवासास बंदी करण्यात आली आहे. भोर प्रशासनाकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
भोर-महाड मार्गात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या कारणास्तव रायगड जिल्हाअधिकारी कार्यालयाकडून घाट रस्ता दि. 1 जुलै ते दि. 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्याबाबत सूचित करण्यात आले असून तसे पत्र रायगड जिल्हा वाहतूक शाखा सहायक पोलीस निरीक्षकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिले आहे. त्यानुसार रायगड हद्दीतील हा रस्ता तीन महिने अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
महाड एमआयडीसी पोलिसांकडून घाट बंदचा फलक महाडमधील राजेवाडी येथील भोर फाट्यावर लावण्यात आला आहे; परंतु भोर प्रशासनाकडून याबाबत काही हालचाली दिसत नसून भोर मार्गावरून कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होणार आहे.