भोर, (प्रतिनिधी) – भोर महाड मार्गावरील वरंधा घाट एक तारखेपासून बंद असल्याची अधिसूचना जारी करूनही या मार्गावर वाहने ये जा करत आहेत. दुरुस्ती कामात अडथळे निर्माण होण्याच्या शक्यतेने रायगड प्रशासनाने भोर रायगड हद्दीच्या सीमेवर दगड मातीचे ढिगारे टाकून रस्ता सर्व वाहनांसाठी शनिवार (ता. १३) पासून बंद केला आहे.
तर वरंधा (ता. महाड) हद्दीत बॅरिकेट व सूचना फलक रायगड पोलिसांकडून लावले आहेत. त्यामुळे भोर कडून, कोकणाकडे व कोकणातून भोरकडे येण्यास घाट बंद झाला आहे. भोर पोलिस ठाण्याकडून सोशल मिडीयाद्वारे रायगड प्रशासनाकडून वरंधा घाट वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
२०१८ पासून घाटरस्ता राहतोय बंद
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात अतिवृष्टीने २०१८ मध्ये झालेली पडझड, २०१९ दुरुस्ती, २०१९ ते २०२० व २१ करोना तसेच २०२१ अतिवृष्टी, २०२२ मध्ये दरडी कोसळल्यामुळे व उंबर्डेवाडी येथे रस्ता खचल्याने, २०२३ मध्ये दरडी व सुरक्षतेसाठी तर २०२४ रस्ता दुरुस्ती, अशा कारणांमुळे सन २०१८ पासून गेली सात वर्षे प्रत्येक वर्षातील काही दिवस रस्ता बंद ठेवण्यात येत आहे.
वरंधा घाट मार्गास पर्यायी मार्ग म्हणून कोकणात जाण्यासाठी पुणे मुळशी पिरंगुट-ताम्हाणी घाट- निजामपूर रोड-माणगाव व पुणे-वाई-आंबेनळी घाटमार्गे पोलादपूर असा असणार असून वरंधा घाट सुरू होईपर्यंत या मार्गाचा अवलंब करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.