म्हेत्रेवस्ती : महावितरण विभागाचे दुर्लक्ष, ट्रान्सफॉर्मरला वेलींचा विळखा
– उमेश अनारसे
पिंपरी – साने चौक ते शिवरकर चौक मार्गावर महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरमधून म्हेत्रेवाडी परिसरात विद्युतपुरवठा केला जातो. हा ट्रान्सफॉर्मर साने चौक पोलीस चौकी व महापालिकेचा म्हेत्रेवाडी दवाखान्याजवळ उभारला आहे. तसेच शेजारी झोपडपट्टी आहे. रस्त्याच्या कडेल फुटपाथलगत हे रोहित्र आहे. त्या रोहित्राला विविध प्रकारच्या वेलींचा विळखा पडला आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे झोकाळून गेला आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊ शकतो. नागरीवस्तीत असलेल्या या ट्रान्सफॉर्मरला वेलींनी वेढला आहे. तेव्हा त्या वेली लवकरात लवकर काढून टाकव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
ट्रान्सफॉर्मरची देखभाल दुरुस्तीचे काम महावितरण विभागाकडे असते. वर्षानुवर्ष याची स्वच्छता महावितरणकडून केली जात नाही. वेली वाढल्यापासून त्या पूर्ण वाळून जातात तरी महावितरणचे अधिकारी याच्याकडे पाहत नाहीत. त्यामुळे एखाद्या दिवशी मोठा अपघात घडण्याची भीती स्थानिक नागरिकांत निर्माण झाली आहे. ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल विद्युत लोड अधिक झाला तर बाहेर फेकले जाते. किंवा रोहित्राचा स्फोट होतो. अशा परिस्थितीत वाळलेले गवत त्या ठिकाणी असेल तर मोठी दुर्घटना होऊन पादचारी व स्थानिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो.
शहरातील बऱ्याच रोहित्रांना संरक्षक जाळी बसविलेली नाही. महावितरणकडून शहरात विविध भागात ट्रान्सफॉर्मर स्फोटाच्या घटना घडल्यानंतर रोहित्राला संरक्षक पत्र्याचे बॉक्स बसविण्यात आले. परंतु अणखी काही भागात ही सुविधा पुरविण्यात आली नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी चिंचवड स्टेशनजवळ रोहित्राचा स्फोट होऊन एका व्यक्तीस जीव गमवावा लागला होता. अशी घटना या ठिकाणी होऊ नये म्हणून स्थानिक नागरिकांतून वेली काढण्याची मागणी होत आहे.
ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला जाळीचे कंपाउंड आहे. परंतु त्याचे प्रवेशद्वार कित्येक दिवसांपासून तुटून गेले आहे. त्यामुळे जवळचे लोक त्या आडोशाचा वापर शौचालय म्हणून करत आहेत. कंपाउंडलाच चिकटून एक छोटी टपरी आहे. त्या टपरीलादेखील संपूर्ण वेलींनी वेढली आहे. अशा दुर्घटना घडल्यास धोका होऊ शकतो.
चौकीच्या फलकाला वेलींचा वेढा
साने चौक पोलीस चौकीचा फलकदेखील वेलींनी वेढला आहे. तरीदेखील पोलीस प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. देशात सर्वत्र स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत. त्यासाठी केंद्रशासनापासून गल्लीबोळापर्यंत स्वच्छतेचे नारे दिले जात आहेत. परंतु शहरातील महावितरण, महापालिका, पोलीस अशा तिन्ही प्रशासनाकडून या गंभीर बाबीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांत प्रशासनाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे.
रुग्णांच्या जीवितास धोका
महापालिकेच्या दवाखान्यात महिन्याला हजार ते तीन हजार रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. महापालिकेच्या दवाखान्याची भिंतीला लागूनच ट्रान्सफॉर्मर उभारला आहे. त्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर वेली वाढल्या आहेत. त्या वेली महापालिकेच्या इमारतीवरदेखील आल्या आहेत. त्यामुळे एखाद्या दिवशी शॉर्टसर्किट होऊन आग लागली तर मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ही घटना दवाखान्याच्या वेळेत घडली तर गरोदर महिला, लहान बालके, ज्येष्ठ नगारिक यांची संख्या अधिक असते. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग संपूर्ण शहरात स्वच्छतेसंदर्भात धडे देत आहे. परंतु दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.