सर्वंकष वाहतूक आराखड्यात शिफारस
चाकण-पुणे-शिक्रापूरला जोडण्याचा इरादा
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात रिंग रेल्वेची शिफारस केली आहे. तळेगाव येथून ही रेल्वे सुरू होणार असून ती चाकण, शिक्रापूर, उरुळी कांचन ते पुणे-मिरज रेल्वे मार्गाला ती जोडणे शक्य असल्याचे आराखड्यात म्हटले आहे.
शहर व ग्रामीण भागातील वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी पीएमआरडीएने यापूर्वीच एल ऍन्ड टी कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीने यापूर्वीच “पीएमआरडीए’च्या शहर आणि शहरालगतच्या सुमारे 20 किलोमीटर लांबीच्या हद्दीचा “सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करून पीएमआरडीएला सादर केला आहे. त्यामध्ये त्यामध्ये पुणे- पिंपरी-चिंचवड आणि तिन्ही कॅन्टोन्मेन्टसह सुमारे 2 हजार चौरस किलोमीटर लांबीच्या परिसरातील वाहतुकीचा आराखडा करण्यात आला आहे.
या भागातील वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्यासाठी मेट्रोसह सुमारे 54 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. या पहिल्या टप्प्यात वाहतूक आराखड्यास पीएमआरडीएने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यामध्ये पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाबरोबरच नव्याने रिंग रेल्वेची शिफारस करण्यात आली आहे. ही नियोजित रिंग रेल्वे प्रस्तावित पुरंदर विमानतळाजवळ नेण्यात आली आहे. चाकण, पुणे आणि शिक्रापूर ही तिन्ही शहरे या रिंग रेल्वे जोडण्यात येणार आहेत. तळेगाव, चाकण, शिक्रापूर एमआयडीसी येथील वाहतुकीसाठी देखील याचा फायदा होणार आहे.