भाटघर परिसरातील शेतकऱ्यांना यावर्षी सरासरीपेक्षा अल्प उत्पादन
जोगवडी – भाटघर धरण परिसरात भात हे मुख्यपीक घेतले जाते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांचे भातपीक उध्वस्त झाले आहे. या भागातील अनेक कुटुंबे भात शेतीवरच अवलंबून असल्याने त्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे वर्षभर संसार कसा चालवावा हा प्रश्न येथील शेतकऱ्यांना
पडला आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने भात उत्पादन घट होणार आहे. भाटघर परिसरात दरवर्षी दिवाळीच्या अगोदर पंधरा दिवस भात काढणीला वेग येतो. परंतू परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी भातशेतीच वाहून गेली. तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने भातपीक आडवे होऊन पाण्यात भाताच्या ओंब्या तरंगत होत्या. यामुळे भातपीक काळे पडले असून कुजले आहे. भूभाग सपाट असलेल्या ठिकाणी उरलेसुरले भातपीक शेतकऱ्यांनी पदरात पाडून घेतले आहे. यामुळे सरासरीपेक्षा यावर्षी शेतकऱ्यांना अत्यंत कमी भाताचे उत्पादन मिळाले आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने जोर धरला होता. भात खाचरात पाणी साचल्याने पिक पाण्यात तरंगत होते. यामुळे भाटघर परिसरातील शेतकऱ्यांची भातशेती उध्वस्त झाल्याने फार मोठा आर्थिक प्रश्न प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. कुटुंबाबरोबरच मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणेही मुश्किल झाले आहे. मुलांना गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके व इतर खर्च करावा लागतो. शिक्षण, मुलांना बसेसच्या पाससाठी पैसे कुठून आणणार, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
आर्थिक तुटवड्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त
येथील शेतकऱ्यांकडे यावर्षी आर्थिक तुटवडा निर्माण झाला असुन पुढील वर्षाचे भातपीक काढेपर्यंत पैसा येणार नाही. त्यामुळे प्रपंचाचा गाडा हाकायचा कसा, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. दैनंदिन पर्यावरणात सतत बदल होत आहेत. याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच या परिसरातील शेताचे नुकसान व पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.