कोयनानगर/पाटण – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाल्याने, गेल्या अनेक दिवसांपासून धरणात बंद झालेली पाण्याची आवक पुन्हा सुरू झाली आहे. धरणात 4,168 क्युसेक पाण्याची आवक झाली असून, 88.52 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरण पूर्ण भरण्यासाठी आणखी 20 टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. पाटण तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. पावसाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून दडी मारल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. कडक उन्हामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून पूर्वेकडील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने शुक्रवारी पुनरागमन केले. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे दिवसभरात 59 मिमी (एकूण 3613),
नवजा येथे 68 मिमी (एकूण 5156), तर महाबळेश्वर येथे 60 मिमी (एकूण 4814) पावसाची नोंद झाली. धरणाची जलपातळी 2147.4 फूट झाली असून, सिंचनासाठी 1050 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पाटण तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने पिके वाया जाण्याची भीती होती. मात्र, पाटण तालुक्यात सर्वदूर शुक्रवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाटण तालुक्यात शुक्रवारी सकाळपासून वेगवान वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.