पळसदेव, (वार्ताहर) – प्राचीन बांधकाम कलेच्या अचाट सामर्थ्याचे साक्षीदार असलेले व शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास लाभलेले पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री पळसनाथाचे प्राचीन मंदिर 45 वर्षे उजनी धरणाच्या पाण्यात राहूनही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. उजनी धरणाची पाणी पातळी जशी कमी होत आहे, तसे हे मंदिर पाण्याबाहेर येत आहे.
सध्या मंदिराचे शीखर पूर्णपणे उघडे झाले असून, मंदिरासमोरील ओवर्यांचा बरासचा भाग पाण्याबाहेर आला आहे. मंदिराचे प्रवेशद्वार अद्यापही पाण्यात असून, येत्या काही दिवसांत तेही पाण्याबाहेर येण्याची शक्यता आहे.
ग्रामदैवतांची प्राचीन हेमाडपंथी मंदिरे असलेल्या पळसदेव ग्रामस्थांनी पुर्नवसनानंतर नव्याने मंदिरे बांधली. यामध्ये त्यांनी प्राचीन मंदिरातील मुत्या, शिवलिंगांची प्रतिष्ठापणा केली. परंतू प्राचीन मंदिराचा ठेवा तसाच ठेवण्यात आला. सध्या 45 वर्षांचा कालावधी उलटूनही ही प्राचिन मंदिरे त्याकाळातील बांधकाम कलेच्या अचाट सामर्थ्याची जाणीव करुन देत डौलाने उभी आहेत.
सतत्पभूमिज पद्धतीचे शिखर असलेले हे पळसनाथाचे प्राचीन मंदिर पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करताना उत्तरेकडे पाहिल्यास स्पष्ठ नजरेस पडते. चोहोबाजूने पाण्याच्या वेढ्यात असलेल्या व सतत लाटांचे तडाखे सोसणारे हे मंदिर लक्षवेधी ठरत आहे. पळसनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये अत्यंत कोरीव काम, सभामंडपाची देखणी मांडणी, दगडी खांबावर उभा ठाकलेले व चुन्याच्या वापराने तयार केलेले हे मंदिर आजही सुस्थितीत असल्याचे दिसते. मंदिराच्या समोर असलेल्या ओवर्यांचा काही भाग ढासळला आहे.
सध्या या ओवर्या व इतर छोटी मंदिरे, मंदिराच्या भोवतालचा तट पाण्याखाली आहे. मंदिरामधील शिलालेखावरील उल्लेखानुसार हे मंदिर हजार वर्षाच्या आसपास बांधण्यात आल्याचे बोलले जाते. या मंदिराचे मुख्य भागाला कोणत्याही प्रकारचे डागडुजी अथवा पुनर्बांधणी करण्याचा प्रसंग ग्रामस्थांवर आल्याची नोंद नाही. या मंदिराच्या पूर्वेकडील दगडी मंदिर सध्या पूर्णपणे उघडे झाले आहे. या मंदिराचा काही भाग ढासळला असून, शीला भग्नावस्थेत पडल्याचे आढळून येत आहे.
मंदिरांचा ठेवा जतन व्हावा
या पुरातन मंदिरांचा ठेवा जतन करण्याची आवश्यकता असून, यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने काम करणे गरजेचे आहे. या मंदिराचे जतन व्हावे यासाठी खासदार सुप्रिया सुळे, व भाजप प्रवक्ते माधव भंडारी देखील या मंदिराला भेट दिली होती. मात्र जीर्णोद्धार बाबत पुढे काही कार्यवाही झाली नाही.
उजनी तळ गाठणार
गतवर्षी जानेवारीमध्ये शंभर टक्क्यांवर पाणीसाठा असलेले उजनी धरण यंदा मात्र जानेवारीत उणे पातळीत गेले. उजनीमध्ये मृतसाठ्यातील 55 टीएमसी म्हणजे -14.60 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आगामी उन्हाळ्यातील पाण्याचा वापर विचारात घेता धरण मोकळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे, जून या दोन महिन्यांमध्ये पाण्याची मागणी वाढून धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होते. यामुळे यंदा पळसनाथ मंदिर पूर्णपणे उघडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही