वालचंदनगर, (वार्ताहर) – विकास कामे होत असताना ती उत्तम दर्जाची कामे होणे जरुरीचे असते; मात्र तालुक्यात एकाने कामाचे टेंडर घ्यायचे अन् मलिदा काढायचा आणि दुसर्याला तिसरा, तिसर्याला चौथा असे अ ब क ड असा फॉर्म्युला निघाला आहे. गावच्या विकासासाठी मिळालेल्या पैशाची लूट होत असेल, तर आपण सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवे असे आव्हान माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
निमसाखर (ता. इंदापूर) कळंब- बावडा मार्ग लगत श्री खंडोबा मंदिर असून या ठिकाणी पौर्णिमेनिमित्त खंडोबा देवाची यात्रा दरवर्षी भरवली जाते. या निमित्ताने नुकतेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची निवड झाल्याने जाहीर सत्काराचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा शाल, श्रीफळ, फेटा, हार देऊन आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक संघटनेचे तालुकाध्यक्ष लालासाहेब चव्हाण व सहकार्यांनी सन्मान केला. यावेळी पाटील यांच्या हस्ते खंडोबा देवाची आरती हस्ते करण्यात आली.
दरम्यान नीरा भीमा साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, संचालक विलास वाघमोडे, माजी सरपंच बाबुराव रणवरे, युवराज पाटील, रणजीत रणवरे, अनिल बोंद्रे, आयुब शेख, पपु बोंद्रे, दत्तात्रय चौधरी, रवी पवार साहेबराव कारंडे, समीर शेख, महादेव दळवी, सचिन पोटफोडे आदी मान्यवर ग्रामस्थ सर्व रामोशी समाज यात्रा कमिटी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, निमसाखर खंडोबा मंदिरासाठी आम्ही काहीही करु, कुठल्याही योजनेतून बसवू पण भव्य आणि दिव्य असेच सभागृह पुढील काळात बांधून देऊ. सोबत या भागातील रस्ता आणि पाण्याची प्रश्न मार्गी लावू
तालुक्यात खुणशीपणाचा कारभार
इंदापूर तालुक्यामध्ये अन्याय, खोटे नाटेपणा व खुणशीपणाचा जो कारभार चालला आहे, तो कुठे तरी थांबला पाहिजे. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षांमध्ये किती शेतीसाठी पाणी आणलं,
किती नोकर्या मिळाल्या, शाळा किती काढल्या, कोणता उद्योग आणला, किती संस्था काढल्या. निमसाखरची जी पाण्याची योजना आहे ती केंद्र सरकारची योजना आहे. जर एखाद्या ठेकेदाराने चुकीचे काम करून बीले काढत असेल, त्याला कुणी पाठीशी घालत असेल त्याची चौकशी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.