पळसदेव, (वार्ताहर) – उजनी धरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अवैधरित्या लहान मासळी (मत्स्यबीज) पकडण्याचा उद्योग सुरू आहे. मच्छरदाणीसारख्या जाळीच्या साह्याने माशांची लहान पिल्ले पकडली जात आहेत. झिंगे पकडण्याच्या पद्धतीने पाण्यात पिंजरे तयार करून अशी मासेमारी केली जात असल्याने, देशी माशांच्या प्रजातीबरोबर चिलापी माशांची संख्या रोडावण्याची शक्यता स्थानिक मच्छिमार व्यक्त करत आहेत. वास्तविक अशा पद्धतीने माशांची पिल्ले पकडणे बेकायदेशीर असल्याने या प्रकाराला आळा घालण्याची मागणी स्थानिक मच्छिमारांमधून होत आहे.
यंदा उजनी धरणातील पाणी पातळी जानेवारी महिन्यात मायनसमध्ये गेली आहे. यामुळे धरणातील मासे मिळण्याचे प्रमाण घटले आहे. चिलापी व्यतिरिक्त मासे मिळत नसल्याने रोहू, कटला, मृगळ यांसारख्या प्रजातीचे काही दिवसांपूर्वीच सुमारे 1 कोटी मत्स्यबीज उजनीत सोडण्यात आले आहे. मात्र काही बाहेरच्या मच्छिमारांकडून मच्छरदानीच्या साह्याने करण्यात येणारी मासेमारी धरणातील मत्स्यबीज वाढीवर संक्रांत आणणारी ठरत आहे.
धरणात सर्व प्रकारच्या वडाप पद्धतीने मासेमारी करण्यास बंदी असताना, गेल्या काही दिवसांपासून धरणात वडापच्या साह्याने मासेमारी करण्याची परवानगी मिळण्यासाठी काहीजण राजकीय नेत्यांचा आधार घेत आहेत. वडाप पद्धतीने मासेमारी केल्यास धरणातील माशांच्या पिल्लांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे स्थानिक मच्छिमार सांगत आहेत.
यावेळी मच्छीमानाचे प्रतिनिधी अनिल नगरे, पोपट नगरे, युवराज नगरे, बलभीम भाई, सौरभ नगरे, लक्ष्मण भोई, ज्ञानेश्वर भाई, विजय चमरे, बाळा नगरे, पोलीस पाटील आप्पा बांडे यांसह स्थानिक मच्छर उपस्थित होते.
गुरूवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मच्छरदानीसारख्या जाळ्याच्या साह्याने मासेमारी करण्यासाठी आलेल्यांना आम्ही हुसकावून लावले आहे. आम्हाला पाहून संबंधितांनी साहित्य टाकून पळ काढला. त्यांनी पडकलेले मत्स्यबीज पाण्यात सोडून देत जाळी ताब्यात घेतली.
याबाबत उजनी पाटबंधारे विभागाला माहिती देऊन कारवाईची मागणी केली; मात्र दुपार उलटूनही पाटबंधारे विभागाचे प्रतिनिधी घटनास्थळी फिरकले नाहीत. यातून अशा प्रकाराला आळा घालण्याबाबत त्यांची असलेली उदासिनता समोर येत आहे.-अनिल नगरे, मच्छिमारांचे युवा प्रतिनिधी
संबंधित ठिकाणी पाहणी करुन मासेमारीसाठी वापरले जाणारे 18 जाळीचे पिंजरे जाळून नष्ठ केले आहेत. संबंधित मासेमारी करणारे रात्रीच पसार झाले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही केली जाईल. -नितीन खाडे, उपविभागीय अभियंता