मुंबई – मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सशी केलेल्या प्रदीर्घ चर्चेत लॉकडाऊनच्या पर्यायावर कोणतीही चर्चा झाली नाही त्यामुळे निर्बंधात वाढ होऊ शकते, मात्र लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार सध्या नाही. लॉकडाऊनमुळे अर्थकारण आणि हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर परिणाम होतो, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांना राजेश टोपे म्हणाले, लॉकडाऊनचा विषय सध्या अजिबात नाही. मुख्यमंत्र्यांच्या प्रदीर्घ अशा आरोग्य विभाग व टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत लॉकडाऊनची कुठेही चर्चा झाली नाही. निर्बंध जरूर वाढवले पाहिजेत साथीमुळे ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर करावा लागेल त्यावेळी ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होऊन जाईल. असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज इतक्या लवकर लॉकडाऊनचा काही विषय नाही.
निर्बंधांच्या बाबतीत नक्कीच कठोर कार्यवाही करण्याचे काम सुरू झालेलं आहे. बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनचा वापर या दोन गोष्टींवरून पुढील निर्णय घेतले जातील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. रुग्ण संख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधाची कठोर पद्धतीने अंमलबजावणी करणे हा शासनासमोरचा आव्हानात्मक विषय आहे.
संक्रमण होऊ नये किंवा संसर्ग वाढू नये या दृष्टिकोनातून उपाय करणे हे शासनाचे प्रथम प्राधान्य आहे, अशी माहिती देखील यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.