कवठे ग्रामसभेत ठराव; महामार्ग बेकायदेशीरपणे ओलांडल्यास दंडात्मक कारवाई
कवठे – कवठे (ता. वाई) या गावाने ग्रामसभेमध्ये कुऱ्हाडबंदी, चराईबंदीसह मळीचा वापर न करण्यासंदर्भात ठराव मंजूर केला. या निर्णयाने निसर्गसंपदेचे रक्षण तर होणार आहेच; परंतु त्याबरोबरच इतर गावांसाठी एक आदर्शसुद्धा ठेवला जाणार आहे.
कवठे गावाने दोन वर्षापूर्वी दुष्काळाच्या झळा सोसल्या.त्यामुळे इथली तरुणाई जागृत झाली अन पाण्यासाठी दाही दिशांनी जे जमेल ते प्रयत्न करण्याचा निर्णय ग्रामस्थ व विशेषतः युवकांनी घेतला. याच ध्यासाने युवकांनी पूर्वेकडच्या डोंगररांगामध्ये समतल चरी घेण्यास सुरुवात केली. या कामामध्ये परिसरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनीही श्रमदान केले. यातूनच नाबार्डच्या काही योजनांची माहिती ग्रामस्थांना मिळाली.
नाबार्डच्या अधिकाऱ्यांना कवठे येथील युवक भूषण डेरे यांनी पाचारण केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कामकाज सुरु केले. नाबार्डच्या नियमानुसार गावातील प्रत्येक शेतजमिनीचे रुपांतरण बागायत शेतींमध्ये होणार असून यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे ग्रामसभेमध्ये ठरवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणू कवठे गावातील शेतीबांधावर असलेले कोणतेही झाड यापुढे तोडले जाणार नाही.
पूर्वेकडे असलेल्या डोंगररांगांवर गुरांना चराईबंदी करण्यात आली आहे. महामार्ग ओलांडताना बेकायदेशीरपणे रस्ता क्रॉसिंग करणे हासुद्धा एक गुन्हाच ठरवला असून असे कोणी सापडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्बंध ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांवर बंधनकारक करण्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये शेतजमिनी मोकळ्या झाल्यावर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारखान्यामधून आणलेली मळी सोडली जाते. ज्याद्वारे पिकांना पोषकता मिळते असा शेतकऱ्यांचा समज आहे.
तरीसुद्धा या मळीचे पाणी विहिरीत मिसळल्याने पेयजल साठ्यात प्रदूषण होते व त्यामुळे कोणत्याही शेतात मळी न सोडण्याचा निर्णय ग्रामस्थांमार्फत घेण्यात आला. तसेच याअगोदर मळीचा वापर केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा मळी न वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
कवठे गावाला नाबार्डच्या माध्यमातून विविध जलसंधारणाची कामे करून आदर्श जलसंधारण गाव म्हणून विकसित करण्यासाठी ग्रामस्थ कटिबद्ध आहेत. यासाठी श्रमदान, प्रसंगी काही स्वरुपात निधी उभारून नियोजनबद्ध पद्धतीने गावाचा विकास करण्यासाठी सर्व ग्रामस्थ प्रयत्न करणार आहेत. याबाबतचा योग्य तो कृती आराखडा ग्रामसभेमध्ये ठरवण्यात आला असून यादृष्टीने ग्रामस्थ वाटचाल करीत आहेत.
श्रीकांत वीर सरपंच, ग्रामपंचायत कवठे