नगर – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील जलाशये तुडुंब भरून वाहत असून मोठी व मध्यम अशा 9 जलाशयांमध्ये 92 टक्क्यांवर जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात सिंचनासाठी पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एकीकडे हे चित्र असले तरी दुसरीकडे मात्र समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्याची धाकधूक वाढली आहे. दोन दिवसापूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या जलसंपदा विभागाच्या बैठकीत नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणासह जायकवाडीतील पाण्याचा वापराची माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे. ती वस्तूनिष्ठ माहिती आल्यानंतर पाणी सोडायचे की नाही याबाबत निर्णय होणार आहे.
नगर जिल्ह्यात तीन मोठे व सहा मध्यम प्रकल्प असून सध्या या प्रकल्पांमध्ये 46 हजार 557 दलघफु पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. त्यात नगर जिल्ह्यात काही तालुक्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये सध्या तरी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै व सप्टेंबर महिना सोडला तर जून व ऑगष्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. 15 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अवघा 43 टक्के पाऊस झाला होता. तब्बल 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. मात्र 20 सप्टेंबरनंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात 92 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा व निळवंडे या तीन मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. भंडारदरामध्ये 100 टक्के म्हणजे 11 हजार 39 दलघफु पाणीसाठा आहे. मुळामध्ये 23 हजार 701 म्हणजे 91.16 टक्के साठा तर निळवंडेमध्ये 99.58 टक्के तो 8 हजार 285 दलघफु पाणीसाठा आहे. सहा मध्यम प्रकल्पापैकी मांडओहळ, पारगाव घाटशिळ, खैरी, विसापूर या प्रकल्पामध्ये पाणीसाठी कमी आहे. अर्थात नगर उत्तर जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठी मुबलक असला तरी नगर दक्षिणमधील धरणांमध्ये जेमतेम पाणीसाठा असल्याने उत्तरेतील धरणांवर आता दक्षिणेतील तालुके अवलंबून आहेत. त्यामुळे या तीन मोठ्या प्रकल्पांवर नगर जिल्ह्याची भिस्त राहणार आहे. उत्तरेतील या तीन धरणांवर समन्यायी पाणी वाटप कायद्याची टांगती तलवार आहे.
15 ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरण 65 टक्के भरले नाही तर त्यानंतर वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश आहेत. त्यानुसार नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी जायकवाडीला सोडावे लागणार आहे. सध्या तरी जायकवाडी 54 टक्के भरले असल्याने किमान 10 टक्के या धरणांमधून पाणी सोडण्याची टांगती तलवार सध्या असल्याने नगर व नाशिककर धास्तावले आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाची बैठक झाली. या बैठकीत नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांसह जायकवाडीमधील पाण्याची सध्याची स्थिती व पाण्याचा वापर याची वस्तूनिष्ठ माहिती शासनाला देण्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर शासन याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.