कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर
पुणे – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर असून प्रशासनातर्फे मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. विभागातील 5 जिल्ह्यांमधील 2 लाख 5 हजार 551 नागरिकांना स्थलांतरित केले आहे. या नागरिकांची 330 मदत केंद्रांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. तर पुरामध्ये 27 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विधानभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील 5 तर सांगलीतील 2 असे एकूण 7 तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. सांगली जिल्ह्यातील 80 हजार 319 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. त्यासाठी 94 तात्पुरती निवारा केंद्रे कार्यान्वित केली आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 154 निवारा केंद्रात 97 हजार 102 नागरिकांची व्यवस्था केली आहे. सातारा जिल्ह्यातील 7 हजार 85 नागरिकांचे, पुणे जिल्ह्यातील 13 हजार 336 नागरिकांचे आणि सोलापूर जिल्ह्यातील 30 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात एनडीआरएफची 8 पथके असून यामध्ये 190 जवान 26 बोटींचा समावेश आहे. त्याचबरोबर आणखी एनडीआरएफची 3 पथके, एसडीआरएफची 2 पथके सांगलीला रवाना होत आहेत. कोल्हापूरमध्ये एनडीआरएफची 7 पथके असून यामध्ये 140 जवान असून 20 बोटी आहेत. प्रादेशिक सैन्य दलाची 4 पथके असून 106 जवान बचाव कार्यात मदत करत आहेत. नौदलाची 14 पथकांमधील 70 जवान मदत करीत आहेत.
…तर दुर्घटना टाळता आली असती
पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथील बोट दुर्घटना ही ग्रामपंचायतीच्या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा आधिक लोक बसल्यामुळे घडली. प्रशासनातर्फे पुरविण्यात येणारी बोट वापरली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.