पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यांपैकी एक असलेले टेमघर धरण रिकामे करून धरण दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाने पुन्हा हाती घेतले आहे. धरणाच्या बाहेरील भितींवर ग्राऊटिंग आणि ड्रिलिंगचा वापर करून गळती रोखण्याचे काम करण्यात येत आहे.
दुरुस्तीसाठी टेमघर धरण रिकामे असणे आवश्यक असल्याने ऑक्टोबरपासून धरणातून शहराच्या गरजेनुसार खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले आहे. धरणाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून धरणात पाणीसाठा करण्यात सुरुवात झाली आहे. मात्र, अवघ्या दोन-तीन वर्षांतच धरणातून गळती सुरू झाली. ती रोखण्यासाठी ग्राऊटिंगचे काम करण्यात आले. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दुरुस्ती बंद ठेवण्यात आले.
धरणातून गळती होत असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नव्हते. यापूर्वी धरण 60 ते 70 टक्के इतकेच भरले जात होते. यंदा पहिल्यांदाच धरण 100 टक्के भरण्यात आले होते. त्यानुसार धरणात 3.71 टीएमसी इतका पाणीसाठा करण्यात आला होता. धरणाबाहेरील भितींमध्ये सिमेंट, फ्लाय ऍश आणि सिलिका यांचे मिश्रण एका विशिष्ट दाबाने सोडण्यात येते. त्यामुळे धरणाच्या भितींमधील पोकळ्या भरून येतात. भितींला मजबुती येते.