सातारा -जिल्हा परिषदेच्या अधिनियमात पदाधिकाऱ्यांनी खासगी स्वीय सहाय्यक नेमण्याची तरतूद नसतानाही जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी जिल्हा परिषदेत खासगी स्वीय सहाय्यकांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता असून पाटी लावण्या आणि काढण्यावरुन वादंग निर्माण झाला होता. अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्येही या निवडीवरुन संभ्रमाचे वातावरण होते.
याबाबत दै. “प्रभात’ ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत खासगी स्वीय सहाय्यकांची पाटी शुक्रवारी काढण्यात आली. त्यामुळे आता अध्यक्षांकडे नवीन स्वीय सहाय्यक येणार का याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी स्वीय सहाय्यक म्हणून जिल्हा परिषद सेवेतील कर्मचाऱ्याची नियुक्ती करु शकतात. अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे सुनील चतूर आणि युवराज मांढरे असे दोन स्वीय सहाय्यक कार्यरत होते.
चतूर दि. 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मांढरे यांनी चतुरांची पाटी काढून टाकली. दरम्यान, अध्यक्ष कबुले यांच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत यांची चतुर यांची अध्यक्ष कबुले यांनी खासगी स्वीय सहाय्यक म्हणून नेमणूक केली असून त्यांना सर्व खातेप्रमुखांनी सहकार्य करावे, असे पत्र काढले होते. चतुर यांना नियुक्तीचे पत्र मिळण्यापूर्वीच त्यांच्या नावाची पाटी अध्यक्षांच्या दालनाबाहेर पुन्हा झळकली.
खासगी स्वीय सहाय्यक नेमण्याऐवजी जिल्हा परिषद सेवेतील कर्मचाऱ्याला संधी द्यायला पाहिजे होती, असाही सूर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होता. याबाबत दै. “प्रभात’ने दि. 16 जूनच्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. शुक्रवारी सकाळी चतूर यांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आल्याने आता नवीन स्वीय सहाय्यक कोण होणार याचीच चर्चा जिल्हा परिषदेत सुरु आहे.