अजित पवार : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठक
पुणे – कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात शासन सकारात्मक आहे. चुकीच्या पद्धतीने किंवा दुबार जमीन वाटप झाले असेल तर ते रद्द करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील उपलब्ध जमिनी कोयना प्रकल्पग्रस्तांना देणे शक्य आहे का याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे येथील विधान भवनमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, उपायुक्त साधना सावरकर, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, श्रमिक मुक्ती दलाचे प्रतिनिधी चैतन्य दळवी, तर “व्हिडीओ कॉन्फरसिंग’द्वारे श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आदी उपस्थित होते.
पुनर्वसनाच्या अनुषंगाने पात्र खातेदारांचे संकलन तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. यासाठी विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांची सेवा घेत काम पूर्ण करावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या. तसेच, कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. ऊर्जा विभागाकडे प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित बाबीसंदर्भात शासनस्तरावरून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.