पाचगणी – अनुसूचित जमातीवर होणारा अन्याय दूर करणेसाठी ऑफ्रोह संघटनेची सातारा शाखा आणि महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
अनुसूचित जमातीच्या मागण्यांमध्ये 14 बोगस आदिवासी आमदार व दोन बोगस आदिवासी खासदार यांना हटवा, आदिवासी विकास विभागात केलेल्या सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका, बोगस जातचोर प्रधान, अंध, पवार, नाईक, बुरुड यांचे बोगस वैधता प्रमाणपत्र रद्द करा, जातचोरीचा ठपका ठेवलेल्या जमातींची लोकसंख्या जाहीर करा, क्षेत्रबंधनातील बोगस जमातींना वैधता प्रमाणपत्र देणाऱ्यांना निलंबीत करा, क्षेत्रबंधनातील बोगस जमातींनी सादर केलेली वैधता प्रमाणपत्रे ग्राह्य न धरता त्यांना नोकरीतून काढा, क्षेत्रबंधनातील बोगस आदिवासींना ज्या समितीने वैधता प्रमाणपत्रे दिली त्यांची चौकशी व्हावी अशा मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
विविध मागण्यांचे फलक हातात घेवून कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी ऑफ्रोह संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी धुमाळ, उपाध्यक्ष मच्छिंद्र माने, सचिव वनदेव थिगळे, कार्याध्यक्ष वानखेडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप धुमाळ, महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली बेस्के, कार्याध्यक्षा नगरधने, ज्येष्ठ सल्लागार नलिनी कोळी, सौ. लोखंडे, सातारा प्रसिद्ध प्रमुख सुशिल माने, नगरधने सर, सुरेश गायकवाड, भानुदास कोळी, सत्यवान रांजणे, बंडा नविलकर, लक्ष्मण धामुनसे व अनेक समाजबांधव उपस्थित होते.