पुणे – सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चव्हाणनगर, शांतीनगर परिसरात रविवारी सायंकाळी वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये चार चारचाकी, एक रिक्षा व दुचाकीचा समावेश आहे. घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयित तरुणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर, दोघे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
वारजे माळवाडी आणि सहकारनगर हद्दीत वाहन तोडफोडीची घटना घडल्या. यानंतर पोलीस आयुक्तांनी दखल घेत 14 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रथम उचलबांगडी व नंतर निलंबनाची कारवाई केली. तरीही तोडफोडीचे सत्र काही थांबलेले नाही, हे रविवारच्या घटनेमुळे अधोरेखित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रविवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान दुचाकीवरुन आलेल्या काही तरुणांनी वाहनांची तोडफोड केली. यामध्ये दोन्ही ठिकाणी मिळून सात ते आठ वाहने फोडली. यासाठी कोणत्या हत्याराचा वापर केला, हे कळू शकले नाही. माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. सर्व जण 17 ते 18 वयोगटातील आहेत. प्राथमिक तपासात जुना वाद किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तोडफोड केली असल्याचे दिसून आहे.’
खाकी वर्दीचा धाक उरलाय का?
सहकारनगरमध्ये वाहन तोडफोडप्रकरणी “मोक्का’ कारवाई करण्यात आली. दरम्यान सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांनी नव्याने सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांत झालेल्या तोडफोडीमुळे गुन्हेगार खाकी वर्दीला जुमेनासे झाले आहेत. हे रविवारच्या तोडफोडीच्या घटनेमुळे सिद्ध होत आहे.
अधिकाऱ्यांची बदली अन् निलंबनही…
काही दिवसांपूर्वी वारजे येथील पपुल्या वाघमारे याने कर्वेनगर आणि सहकारनगर परिसरात तब्बल 26 वाहनांची तोडफोड केली होती. त्याला प्रथम अटक करून मोक्का लावण्यात आला आहे. मात्र, हे प्रकरण रोखता न आल्याने पोलीस आयुक्तांनी वारजे आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची प्रथम बदली आणि नंतर निलंबनाची कारवाई केली.
मोक्का कारवाई, तर दुसरीकडे तोडफोड
सहकारनगर हद्दीत धुडगूस घालत यापूर्वी वाहनांची तोडफोड करणाऱ्या सिद्धार्थ विजय गायकवाड याच्यासह त्याच्या
16 साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी रविवारी दुपारी “मोक्का’अंतर्गत कारवाई केली. त्याला काहीच तास झाले असताना, सायंकाळच्या सुमारास ही वाहन तोडफोडीची घटना घडली. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला गुन्हेगार जुमानत नसल्याचे दिसते. यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे मात्र कठीण झाल्याचे चित्र आहे. या प्रश्नी पोलीस काय भूमिका घेणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.