पुणे – तलाठी यांच्या बदलीचे अधिकार हे प्रांताधिकाऱ्यांना होते. त्यामुळे एक किंवा दोन तालुक्यांमध्येच तलाठ्यांची पूर्ण सेवा होत होती. आता शासनाने यामध्ये बदल करून हे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे तलाठी यांच्या बदली जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात होणार आहे.
2013 पासून उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी यांच्या कार्यालयांची पुनर्रचना होऊन एका उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत एक किंवा दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. तलाठी या संवर्गाची आस्थापना उपविभागीय कार्यालयाच्या स्तरावर असून आस्थापनाविषयक बाबी, बिंदुनामावली, बदली आदी बाबत उपविभागीय अधिकारी स्तरावर कार्यवाही करण्यात येते.
उपविभागीय अधिकारी कार्यालयांच्या पुनर्रचनेनंतर काही उपविभागाचे क्षेत्र एका तालुक्यासाठी निश्चित झालेले आहे. त्यानुसार तलाठी यांना केवळ एकाच तालुक्यामध्ये पूर्ण सेवा कालवाधीमध्ये काम करावे लागत होते. यामुळे कामामध्ये सारखेपणा येऊन नावीन्यता व उप्रकमशीलता याचा अभाव दिसून येतो. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित केली आहे.
त्यानुसार तलाठी यांच्या संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी हे जिल्हाधिकारी राहणार असून तलाठी पदावरील नियुक्त झालेली व्यक्ती संबंधित जिल्ह्यास बदलीस पात्र राहणार असल्याचे शासनाने म्हटले आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाचे अवर सचिव रमेश जगताप यांनी जारी केला आहे.
वेगवेगळ्या तालुक्यांत संधी
तलाठी संवर्गाची पदभरती प्रक्रिया जिल्हास्तरावरून होत असल्याचे तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर ठेवल्यास तलाठ्यांना संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. वेगवेगळ्या तालुक्यांतील वेगवेगळ्या भौगोलिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीनुसार उपक्रमशीलतेने काम करण्यास तलाठी प्रवृत्त होतील, असे शासनाने म्हटले आहे.
सहा वर्षांनी प्रस्ताव मंजूर…
काही तलाठ्यांची वाढत असलेली मक्तेदारी, कामे प्रलंबित ठेवण्याची वृत्ती, नागरिकांना मारावे लागणारे हेलपाटे या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून तलाठ्यांचे केडर तालुक्याऐवजी जिल्हा केडर करण्याचा विचार सुरू होता. 2017 मध्येच यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, विविध कारणांमुळे हा प्रस्ताव रखडला होता. अखेर सहा वर्षांनी राज्य शासनाकडून हा प्रस्ताव मंजूर केला आहे.