छत्रपती संभाजीनगर – मंगळवारी सायंकाळी कोल्हापूरमध्ये एका वादग्रस्त पोस्टमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे आज कोल्हापुरात बंदची हाक देण्यात आली आहे. तर काल संगमनेमध्ये देखील हिंदू समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या मोर्चाला गालबोट लागले. समनापूर गावातून मोर्चेकरी घरी जात असताना दोन गटांत शिवीगाळ होऊन दगडफेकीला सुरुवात झाली होती. या संपूर्ण घटने शरद पवारांनी भाष्य केले आहे. राज्यातील हिंसाचाराच्या घटनांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले की, “अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये आणि कोल्हापूरमध्येही तणाव निर्माण झाला आहे. कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. तो मेसेज चुकीचाही असेल, पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं हे काही योग्य नाही. काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत आहेत. राज्यात कटुता निर्माण करणे हे चांगले लक्षण नाही.”
“राज्य सरकारने पायाभूत सुविधांवर गुंतवणूक करावी. तर धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी प्रोत्साहित करत आहेत. तसेच कोल्हापुरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा दंगलीसारख्या घटनांना सत्ताधारी प्रोत्साहित करत आहे,” असेही पवार म्हणाले.
यावेळी शरद पवार यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनावरही भाष्य केले आहे. ‘कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालं अस काही नाही. केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. ब्रिजभूषण सिंह हे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, सरकार म्हणत आहे आधी आम्ही चौकशी करणार, सरकार चौकशी करत आहे. मात्र ब्रिजभूषण सिंहला अटक झालेली नाही.’