नगर -रेल्वेने घरी परतण्याची प्रतीक्षा करणाऱ्या परप्रांतीय कामगारांसाठी केडगावमधील भाग्योदय मंगल कार्यालयात स्वयंसेवी संस्थांनी आज “राहत केंद्र’ सुरू केले. दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल 67 परप्रांतीय कामगार या निवारा केंद्रात दाखल झाले. तब्बल 300 कामगारांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था येथे होईल, अशी माहिती स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांची आज सामाजिक कार्यकर्ते ऍड. श्याम असावा, डॉ. महेश मुळे, अनिकेत कौर, अजित कुलकर्णी, हनीफ शेख, शबाना शेख आदींनी भेट घेतली.
महापालिका, राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, महसूल विभाग व पोलिसांच्या समन्वयाअभावी परप्रांतीय कामगारांची नगरमध्ये कालपासून होणारी फरपट त्यांनी विशद केली. उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, ओरिसा, आसाम येथून आलेले श्रमिक आपल्या गावी जाण्यासाठी तारकपूर येथे जमले. काल शासनाच्या धोरणात अचानक बदल झाला. त्यातून फक्त मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे जाणाऱ्या लोकांसाठीच बससेवा महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशाकडे जाणारे सर्व कामगार नगरमध्ये पुन्हा अडकले. दरम्यान, 1200 लोक जमल्यावर स्वतंत्र ट्रेनद्वारे त्यांना गावी पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. परंतु तोपर्यंत नगरमध्ये कुठे राहायचे अन् काय खायचे? असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले.
नगरमधील सर्वच निवाराकेंद्र हाउसफुल असल्याचे प्रशासन सांगत होते. त्यावर महापालिकेचे एखादे मंगल कार्यालय तुम्ही उपलब्ध करून दिले तर तीनशे लोकांच्या राहण्याची, जेवणाची व वाहतुकीची आम्ही व्यवस्था करू, अशी भूमिका या संस्थांनी जाहीर केली. बालभवन टीमच्या समन्वयक शबाना शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कालपासूनच सर्व प्रवाशांच्या याद्या तयार केल्या. त्या महापालिकेत व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आल्या. बिहार आणि उत्तरप्रदेशातून आलेल्या लोकांची काल रात्री रेल्वेने जाण्यासाठी सोय झाली. आज सकाळी पुन्हा सुमारे 300 श्रमिक गावी परत जाण्यासाठी तारकपूर परिसरात जमले. त्यांची फरपट पाहून राहत केंद्र सुरू करण्याची कल्पना आयुक्तांकडे या संस्थांनी मांडली. त्यास आयुक्तांच्या सहयोगामुळे केडगाव येथे “राहत केंद्र’ म्हणून मान्यता मिळाली. त्या ठिकाणी प्रवेशासाठी अथवा पोहोचण्यासाठी 9011026483 क्रमांकावर संपर्काचे आवाहन संस्थांतर्फे करण्यात आले आहे.