भाटघर – मे महिना संपत आला तरीही भाटघर धरणामध्ये तीस टक्के पाणीसाठा शिल्लक असून, 8 टीएमसी एवढा पाणीसाठा सद्यःस्थितीला उपलब्ध आहे. गतवर्षी याच काळात केवळ 2 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. त्यावेळी 6 टक्केच धरण भरलेले होते. सद्यःस्थितीत 2 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग धरणातून होत आहे.
इंग्रज राजवटीत 1927 साली वेळवंडी नदीवर भाटघर धरण बांधले. धरणाची पाणी साठवण क्षमता 23.75 टीएमसी आहे. विसर्गासाठी एकूण 81 दरवाजे आहेत. यातील 45 दरवाजे स्वयंचलित आहे. ठराविक प्रमाणाच्या वर पाण्याची पातळी वाढल्यास स्वयंचलित दरवाजे खालच्या बाजूला आपोआप सरकून पाण्याचा विसर्ग सुरू होतो. पाण्याचा विसर्ग नीरा नदीत होऊन वीर धरणाला विलीन होतो. 1968 मध्ये धरणाच्या मजबुतीकरणासाठी पाहणी केली. यावेळेस धरणाच्या भिंतीलगत पूर्व बाजूने विशाल सपोर्ट देण्यात आले. मागील वर्षी 4 ऑगस्टला धरण शंभर टक्के भरले होते. यंदा पाणीटंचाई नाही.
गेल्या नऊ महिन्यांपासून वीज निर्मिती बंद
मागील वर्षी पावसाने हाहाकार माजवला होता. दरम्यानच्या काळात नीरा देवघर आणि भाटघर धरणातून जोरदार पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वीर धरणाच्या पाण्याला फुगवटा निर्माण झाला होता. याचा परिणाम होऊन भाटघर जलविद्युत वीज निर्मिती केंद्रात पाणी शिरल्याने तांत्रिक बिघाड झाला होता. आजही दुरुस्तीचे काम चालू असून अद्याप नऊ महिन्यांपासून याठिकाणी वीज निर्मिती बंद आहे.
…पण लॉकडाऊनमुळे पिकाला भाव नाही
शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध असले तरी पिकांच्या विक्री अभावी शेतकरी वर्ग चिंतेत आहे. लॉकडाऊनमुळे पुणे येथील भाजी मार्केट बंद आहे. यामुळे शेतकरी वर्ग भाज्यांची आणि इतर फळांची गावातच किरकोळ विक्री करीत आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध होत असले, तरी औषध फवारणीचा खर्च, खतांचा खर्च परवडणारा नसल्याने काही शेतकऱ्यांनी पीक उपटून टाकले आहे. यामुळे पाणी मुबलक प्रमाणात असले तरी भाजी मार्केट बंद असल्याने विक्रीचा प्रश्न गंभीर झाला आहे.