दहिवडी – सातारा परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे कृष्णा नदीतील वाहून जाणारे पाणी टेंभू योजनेच्या माध्यमातून महाबळेश्वरवाडी तलावात सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
माण तालुक्याच्या पूर्वेकडील वरकुटे मलवडी परिसरात शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जून महिना संपून गेला तरी वरुणराजा काही बरसलाच नाही. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वरकुटे मलवडी परिसरातील शेनवडी, कुरणेवाडी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी या ग्रामपंचायतीने पत्राद्वारे संबंधित विभागाकडे मागणी केली होती. तरी देखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. प्रशासनाने या ग्रामपंचायतींच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणीही श्री. जगताप यांनी पत्राद्वारे केली आहे.
जिल्ह्यामध्ये कोयना आणि महाबळेश्वर परिसरात प्रचंड पाऊस असल्यामुळे कृष्णा नदीचे पात्र ओसंडून वाहत आहे. त्याच कृष्णा नदीतील वाहून जाणारे पाणी टेंभू योजना प्रकल्पाच्या माध्यमातून महाबळेश्वरवाडी तलावात सोडले तर वरकुटे मलवडी परिसरातील शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल आणि प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचा टॅंकर व चारा छावणी सरू करण्यासाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे प्रशासनाने त्वरित टेंभूचे पाणी महाबळेश्वरवाडी तलावात सोडावे अशी अपेक्षा श्री. जगताप यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
टॅंकर सुरु करण्याची मागणी
वरकुटे मलवडी परिसरातील शेनवडी, कुरणेवाडी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी या ग्रामपंचायतीने टेंभूचे पाणी महाबळेश्वरवाडी तलावात सोडण्यासाठी पत्राद्वारे जिल्हा परिषदेकडे मागणी केली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनीही त्यास दुजोरा देत, जलसंधारण विभागाशी बोलणी केली होती. तरीदेखील जलसंधारण विभागाने याकडे कानाडोळा करून मानवनिर्मित दुष्काळ तयार करण्यास हातभार लावला.
या मानवनिर्मित दुष्काळास कारणीभूत असणाऱ्या जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. संपूर्ण पावसाळा संपत आला तरी माण- खटावमध्ये अजून पावसाचा तपास नाही. त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाला आहे. शेळी, मेंढी व जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. शासनाने त्वरित या विभागाची पाहणी करून चारा छावण्या व पिण्याचे पाणी टॅंकर सुरू करावेत, अशी मागणीही श्री. जगताप यांनी केली आहे.