खासदार सुप्रिया सुळे ः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना केले टॅग
जळोची : बारामती लोकसभा मतदारसंघात अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याची स्थिती दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब आहे. शासनाने तातडीने टंचाईचा आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना पशुधन जगवावे कसे याची चिंता आहे.
पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. आणखी उन्हाळा सुरू व्हायचा आहे, तोवरच ही परिस्थिती असून, ती पुढील काही दिवसांत आणखी भीषण होऊ शकते, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
‘नागरिकांना होणारा त्रास बघूनही शासन शांत कसे बसू शकते याचे आश्चर्य वाटते’. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी बारामती लोकसभा मतदारसंघातील टंचाईचा आढावा घेऊन तातडीने चारा छावण्या आणि पाण्याचे टॅंकर सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.