पुणे : केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात केलेल्या जाचक बदलांना विरोध करत ट्रक, टँकरसह व्यावसायिक वाहनचालकांनी संप पुकारल्याने पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात इंधन तुटवड्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सरकारने तातडीने संपकरी बांधवांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी येथे केली. केंद्र सरकारने जनतेला वेठीस धरू नये, असेही ते म्हणाले.
हिट अँड रन कायद्यातील बदलांना विरोध दर्शवत ट्रक, टँकर चालकांनी सोमवारपासून (ता. १) संप पुकारला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसाठी पंपावर मोठी गर्दी होत आहे. काही ठिकाणी २-२ किलोमिटरपर्यंत वाहन चालकांच्या रांगा लागल्या आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोल पंप हे इंधन संपल्याने बंद आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरगुती गॅस, दूध, भाज्यांसह अनेक जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धतता कमी झाली असून सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी संपकरी वाहनधारकांसोबत चर्चा करून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा आणला असून यात अनेक जाचक नियम लागू केले आहेत. यानुसार वाहनचालकांना अपघात झाल्यानंतर १० वर्षे शिक्षा आणि ७ लाखाचा दंड होणार आहे. हा वाहनचालकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा काळा कायदा आहे. या विरोधात पुकारण्यात आलेल्या संपाला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. जोपर्यंत संपकरी वाहनचालकांना दिलासा मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष संपकरी बांधवांच्या सोबत उभा आहे, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.