पाटणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी झारखंडच्या देवघर येथे आणि बिहारमध्ये दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होते. मोदींच्या आगमनानिमित्त झारखंडमधील प्रमुख वर्तमान पत्रांत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडून मोठ्या जाहीराती देण्यात आल्या होत्या. मात्र नितीश यांच्याकडून अशी कोणतीही कृती केली गेली नाही. ते मुद्दाम केले गेला का, आणि भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दलातील संबंध पुन्हा बिघडले आहेत का, अशा चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत.
बिहार विधानसभा भवनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी स्तंभाचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एका संग्रहालयाची कोनशीलाही त्यांच्या हस्ते बसवण्यात आली. बिहार विधानसभेच्या परिसराला मोदी यांची ही पहिलीच भेट होती. त्यामुळे त्याचा गाजावाजा करत चांगली प्रसिध्दी राज्य सरकारकडून केली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे काहीच करण्यात आले नाही.
दरम्यान, सरकार आणि विधानसभा अध्यक्षांचे कार्यालय यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे हे घडले असावे असाही कयास वर्तवला जातो आहे. तर जाहीरात दिली गेली नाही ही मानवी चूक असू शकते. मात्र मुद्दाम दिली नाही असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल असा दावा जनता दलाच्या सूत्रांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधानांचा हा दौरा विधानसभा अध्यक्षांच्या आग्रहावरून झाला. त्याकरता विधानसभा सचिवालय चांगलेच सक्रिय होते. राज्य सरकारकडून ज्या ज्या सहकार्याची त्यांना अपेक्षा होती ती पूर्ण करण्यात आली होती.