जुन्नर -पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र व प्राप्तिकर भरत असलेल्या जुन्नर तालुक्यातील लाभार्थींकडून वसुली प्रक्रिया सुरू केली आहे. तालुक्यात 2140 लाभार्थ्यांकडून 1 कोटी 75 लाख 98 हजार रुपये वसूल करण्यासाठी नोटीस देण्याची प्रक्रिया तहसीलदार कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.
शासनाकडून लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये रक्कम पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत बॅंक खात्यात जमा करण्यात करण्यात आली होती; पण त्यापैकी अनेक कुटुंबांतील सदस्य शासकीय नोकरदार, तसेच काही शेतकरी आयकर भरत असल्याने अशा व्यक्ती लाभास अपात्र असल्याचे छाननीमध्ये आढळले आहे. जुन्नर तालुक्यातील 2140 शेतकरी हे या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरले असून, 1 कोटी 75 लाख 98 हजार वसूल करायची आहे.
1817 खातेदारांना तहसीलदार कार्यालयामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या असून 323 खातेदारांना नोटीस देण्याचे बाकी आहेत. काही बाहेरगावी तर काहींचा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. एकूण वसूल करावयाच्या रकमेपैकी 25 लाख 64 हजार रुपये वसूल करण्यात आले असून, अजूनही 1 कोटी 50 लाख 34 हजार रुपये वसूल करायचे बाकी आहेत.
15 दिवसांमध्ये नोटीस प्राप्त शेतकऱ्यांनी जुन्नर तहसील कार्यालय येथे कार्यालयीन वेळेमध्ये धनादेशद्वारे रक्कम जमा करावी, अशा प्रकारच्या नोटिसा संबंधितांना दिल्या जात असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिली. तसेच संबंधित गावच्या गावकामगार तलाठी यांच्याकडे देखील ही रक्कम भरू शकत असल्याचे मुंढे यांनी सांगितले.